सीमा नाईक : वेंगुर्ले महाविद्यालयाच्या ‘युवा स्पंदन‘ महोत्सवाला प्रारंभ…
वेंगुर्ले.ता.८:आपल्याला काय व्हायचे आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी अगोदर करिअरची निवड करावी. अशी संधी पुन्हा येत नाही. मैदानी खेळ खेळा, शिक्षकांकडून प्रेरणा घ्या व महाविद्यायलाचे नाव उज्वल करा असे प्रतिपादन समाजसेविका व उद्योजिका सीमा नाईक यांनी केले.
वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या ‘युवा स्पंदन‘ या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘सारी डे‘ व ‘टाय डे‘ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेविका व उद्योजिका सीमा नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका शितल आंगचेकर, पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरड, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, युवा महोत्सव चेअरमन दिलीप शितोळे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रकाश शिदे, विद्यार्थी प्रतिनिधी आशिष पालकर, विद्यार्थीनी प्रतिनिधी शिवानी बांदेकर व निकिता गडेकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे माहिती मिळते. काय घडणार आहे, मी काय होणार याची माहिती मिळत नाही. ते शोधण्यासाठी आपल्याला जगायचे आहे. विद्यार्थ्यांनी आयफोन व ब्रॅण्डेड कपडे स्वतःच्या हिमतीवर घ्या असे आवाहन शितल आंगचेकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आई-वडीलांच्या कष्टाची जाण ठेवावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा-परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाल्यास मला त्यांचा अभिमान वाटेल असे रुपाली गोरड यांनी सांगितले. बॅ.खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्याचे धडे दिले जातात. त्यासाठी प्राध्यापक सहकार्य करतात. परंतु विद्यार्थीच स्वतःच्या कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन आपली धुरा सांभाळत असल्याची माहिती प्राचार्य देऊलकर यांनी दिली.
विद्यार्थीनी प्रतिनिधी शिवानी बांदेकर हिने ‘युवा स्पंदन‘ महोत्सवाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सांस्कृतिक युवा महोत्सवाचे चेअरमन दिलीप शितोळे यांनी सूत्रसंचालन व आभार संपदा दिक्षित यांनी केले.