पंचायत समिती सभा;मायनिंग वाहतूक करणा-या बेदरकार डंपरवर कारवाईची मागणी…
सावंतवाडी ता.१०: चांदा ते बांदा योजना गुंडाळून शासनाने महिला बचत गटांची थट्टा केल्याचा आरोप आज येथील आयोजित पंचायत समितीच्या बैठकीत उपस्थित विरोधी गटाचे सदस्य रवी मडगावकर यांनी केला.या योजनेत पैसे गुंतवणाऱ्या महिला बचत गटांची फसवणूक झाली आहे.त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे पैसे तात्काळ परत करा,अशी मागणी यावेळी करण्यात आली,तसा ठरावही यावेळी घेण्यात आला.दरम्यान मळगाव,रेडी मार्गावर मायनिंग घेऊन धावणारे डंपर बेदरकारपणे चालवले जात आहेत.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावर बंधन घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांनी लक्ष घालावे,अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल,असा इशारा यावेळी सदस्यांकडुन देण्यात
आला.
पंचायत समितीची मासिक बैठक आज सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी व्यासपीठावर उपसभापती शीतल राऊळ,गटविकास अधिकारी गजानन भोसले,राजू कासकर उपस्थित होते या बैठकीत चांदा ते बांदा या बंद पडलेल्या योजनेवरून सत्ताधारी सदस्यांनी पशुसंवर्धन विभागाचे एस.बी.ठाकूर यांना टार्गेट केले.या विभागाअंतर्गत चांदा ते बांदा योजनेमधून तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेळीपालनासाठी पैशाची गुंतवणूक केली आहे.त्यामुळे ही योजना बंद पाडून त्यासाठी मंजूर असलेला निधी ही शासनाने रद्द केल्याने शेतकरी उघड्यावर आले आहेत.एकीकडे महिला बचत गटाच्या सक्षमीकरणाची भाषा करणाऱ्या या सरकारने महिला बचत गटांवर अन्याय केला आहे.अशाने महिला बचत गटाने तसेच शेतकऱ्यांनी चांदा ते बांदा योजने मध्ये कुक्कुटपालन तसेच शेळी पालनासाठी पैशाची गुंतवणूक केली.या पैशांचे काय असा प्रश्न सदस्य रवींद्र मडगावकर यांनी उपस्थित केला.तर सदस्य संदीप गावडे यांनी शासनाने महिला बचत गटांची पद्धतशीरपणे फसवणूक केल्याचा आरोप यावेळी केला.
लघुपाटबंधारे विभागांतर्गत मंजूर झालेल्या कामाचे टेंडर अधिकारी वर्ग नसल्याने रखडले आहे.हा प्रकार योग्य नसून संबंधित टेंडर प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी,प्रक्रिया राखणे हा विकास कामांना खो घातल्यासारखा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.तर सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात पुण्यातुन येणाऱ्या एसटी बसेस वेळेवर सोडण्या बरोबरच त्या नियमित सोडण्यात याव्या यामध्ये सातत्य ठेवावे,अशी विनंतीही श्री.राऊळ यांनी एसटी विभागाचे मोहनदास खराडे यांच्याजवळ केली.
वनविभागांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जैवविविधता समिती स्थापन करून वन क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातील जैवविविधतेची नोंद येत्या 31 जानेवारी पूर्वी करण्यात यावी असा आदेश केंद्राच्या वनविभागाकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे याबाबत ची माहिती संबंधित अधिकाऱ्याने आज येथे दिली ही ही नोंद 31 जानेवारी पूर्वी न झाल्यास ग्रामपंचायतींना दहा लाख रुपयांचा दंडही होऊ शकतो असे यावेळी सांगण्यात आले. कळणे मायनिंग साठी मळगाव रेडी या मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बंधन घालावे असे आदेश संबंधित कंपनीच्या ठेकेदाराला देण्यात यावेत अशी केली तर माळगाव ब्रिज येथे होणारे अपघात लक्षात घेतात सर्व्हिस रोडच्या बाजूने येणारी वाहने दिसावी याकरता आरसे बसवण्याची मागणी उपसभापती शीतल राऊळ यांनी केली.