विनायक राऊतांचा विरोधकांना चिमटा;कोणी ढोल बडवले,तरी जनता सुज्ञ…
सावंतवाडी ता.१३: शहराचा विकास करण्याचे काम तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.तब्बल पावणे दोनशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी याठिकाणी आणला,मात्र काहीजण आता नाहक श्रेय घेण्याचे काम करत आहेत.शहर सुशोभिकरणाचे काम केवळ केसरकर यांच्या प्रयत्नातून झाले,ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे कोणी कितीही ढोल बडवले तरी,येथील जनता सुज्ञ आहे,असा चिमटा खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांना काढला.पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यानिमित्त येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात श्री. राऊत बोलत होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत,माजी पालकमंत्री दीपक केसरकर,अरुण दुधवडकर,संजय पडते,मायकल डिसोझा,रुपेश राऊळ,संजना सावंत,अण्णा केसरकर,अपर्णा कोठावळे,प्रशांत कोठावळे,नीता कविटकर,गुणाजी गावडे,अमेय तेंडोलकर, प्रतीक बांदेकर,सुरेंद्र बांदेकर
आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले,शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे.आता जे आले आहेत,ते निव्वळ टीका करण्याचे काम करत आहेत.आणि फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र विकास कामे कोणी केली,कोणाच्या माध्यमातून झाली,याची येथील जनता निश्चितच ओळख ठेवेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी पालकमंत्री केसरकर यांनी नवनिर्वाचित पालकमंत्री उदय सामंत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या हातून सुटावेत,कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा,अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करत असल्याचे त्यांनी सांगितले.