नगराध्यक्ष दिलीप गिरप : विविध कार्यक्रमाची मेजवानी…
वेंगुर्ले : ता.१४: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे १८ ते २१ जानेवारी या कालावधीत भव्य “स्वच्छता क्रीडा सांस्कृतिक महोत्सव” आयोजित केला आहे. अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.
वेंगुर्ले नगरपरिषद कॅम्प क्रीडांगणावर हा महोत्सव होणार आहे. १८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता “स्वच्छता जनजागृती चित्ररथ स्पर्धा” दाभोली नाका ते कॅम्प क्रीडांगण पर्यंत होणार आहे. तर महोत्सवाचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमानंतर रात्री ८ वाजता स्थानिक कलाकारांचा भव्य असा “आरंभ उत्सव” कार्यक्रम होणार आहे.
रविवार १९ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता रन फॉर क्लीन वेंगुर्ला हे ब्रीदवाक्य घेऊन “राज्यस्तरीय हाफ क्लीनेथॉन स्पर्धा” होणार आहे. यावेळी रात्रीस खेळ चाले मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सायंकाळी ७:३० वाजता खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, उद्योजक रघुवीर मंत्री यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध मराठी गायिका अक्षता सावंत यांचा गाण्यांचा कार्यक्रम आणि फु बाई फु व महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील प्रमुख कलाकार माधवी जुवेकर, शशीकांत केरकर, प्रभाकर मोरे व किशोरी आंबिये यांचा विनोदाचा हंगामा कार्यक्रम सादर होणार आहे. सोमवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झी मराठी सारेगम फेम मृण्मयी तिरोडकर व अभिजीत कोसंबी यांचा “स्वर जल्लोष” हा कार्यक्रम सादर होणार असून यावेळी ओम साई डान्स ग्रुप खेड यांचा बहारदार नृत्याविष्कार पहावयास मिळणार आहे.
तर मंगळवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या उपस्थित महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी रात्री ८ वाजता पार्श्वगायिका कविता राम व डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांचा सुरांची अविस्मरणीय मैफिल सजवणारा “बेधुंद क्षण” हा कार्यक्रम होणार असून यावेळी सिद्धाई डान्स ग्रुप यांचा सुपरहिट डान्सिंग नजराणाही वेंगुर्ले वासियांना पाहता येणार आहे. तरी या महोत्सवात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष श्री गिरप यांनी केले आहे.