सायंकाळी घडलेला अपघात; आठवडाभरात माजगावमधील दुसरी घटना …
सावंतवाडी.ता,२१: माजगाव येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक बालाजी रणशुर (१७)रा.माजगाव या महाविदयालयीन मुलाचे उपचारादरम्यान निधन झाले.माजगाव गावातील अपघातात मृत्यू झालेली ही दुसरी घटना आहे.हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास माजगाव-गुलाबी तिठा परिसरात घडला होता.त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.दरम्यान उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
येथील वकील बालाजी उर्फ बी.बी.रणशुर यांचा तो मुलगा होता.आपले काहीतरी काम असल्यामुळे तो दुचाकी घेऊन माजगावच्या दिशेने जात होता.यावेळी दुचाकीचा ताबा सुटल्यामुळे त्याचा वाटेत अपघात झाला होता.यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.अशा परिस्थितीत त्याला अधिक उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आले होते.मात्र त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले,असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान आठ ते दहा दिवसांपूर्वी माजगाव येथील किरण परीट-पाटील या युवकाचे अपघाती निधन झाले होते.ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडल्यामुळे माजगाव वासीयातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.