राष्ट्रीय महामार्ग विभागाची कारवाई; नियमबाह्य बांधकाम झाल्याचे उघड…
बांदा.ता,३०: बांदा सीमा तपासणी नाक्याची संरक्षक भिंत नियम धाब्यावर बसवून उभारल्याचे सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून ७५ मीटरवर नियमानुसार बांधकाम होणे अपेक्षित असताना केवळ २६ मीटरवर बांधकाम केले आहे. सदर बांधकाम अनधिकृत असून तातडीने बेकायदा बांधकाम तोडण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे रत्नागिरी कार्यकारी अभियंता यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत. या आदेशामुळे एमएसआरडीसीची ठेकेदार कंपनी अडचणीत आली आहे.
आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका भूसंपादन प्रक्रियेपासूनच वादाचा ठरला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानीपणे हा टोलनाका उभारण्यात आला आहे. याविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी लढा उभारला आहे. बेसुमार वृक्षतोड, खनिजयुक्त माती चोरी, बेकायदा बांधकाम त्यांनी सिद्ध करुन दाखविले आहे.
शासन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून ७५ मीटरवर औद्योगिक बांधकाम झाले पाहिजे.मात्र ठेकेदार कंपनीने केवळ २६ मीटरवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. शासनस्तरावरून सदर बांधकाम करण्याची परवानगी मिळविल्यास तसे अभिलेखे सादर करण्याच्या सुचना रत्नागिरी हायवे कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापपर्यंत तसे कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे बेकायदा बांधकाम स्वखर्चाने तोडण्याचे आदेश रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत. या आदेशाने संबंधित ठेकेदार कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. या आदेशाने कल्याणकर यांच्या लढ्याला बळ मिळाले आहे.