नरेंद्र पाटील; सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित मेळाव्यात आवाहन…
ओरोस ता.०६:
मराठा समाज पहिल्यापासून स्वाभिमानी आहे. ‘जेवलो तर तुपाशी, नाहीतर उपाशी’ असा बाणा या समाजाचा आहे. परंतु या समाजाने सत्य परिस्थिती स्वीकारली पाहिजे. ग्रामीण भागातील मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती खुपच खालाविलेली आहे. मराठा समाज आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल मराठा बांधवांनी अनुवंशिक असलेला खोटा एटिट्यूड सोडावा. आपली आर्थिक परिस्थिती सांगण्यास लाजु नये. कर्ज घेवून व्यावसायिक बनावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथील मराठा समाज मेळाव्यात बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढी सभागृहात आयोजित मराठा युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्वयक वकील सुहास सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, कौशल्य विकास कार्यक्रमचे सहाय्यक आयुक्त सुनील पवार, विजय राणे, एस टी सावंत, संग्राम प्रभुगांवकर, लवु वारंग यांच्यासह अन्य उपस्थित होते. अध्यक्ष पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज अर्धपुतळा, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुडाळ तालुक्यातील मराठा सरपंच, उपसरपंच यांच्याहस्ते नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष पाटील यांनी, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा संघटना स्थापन केल्यावर व आर्थिक निकषावर कर्ज हा कायदा होवून 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 22 मार्च 1982 रोजी मराठा आरक्षणासाठी पहिले आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मागण्या मान्य न झाल्याने अण्णासाहेब यांनी आपली जीवनयात्रा संपविली. 1999 मध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. यावेळेचे युती सरकार गेल्यानंतर 2014 पर्यंतच्या सरकारने दुर्दैवाने भरीव काम केले नाही. कोपर्डीची घटना घडल्यावर मराठा समाज रस्त्यावर उतरला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंडळाला पुनर्जीवित केले. हे महामंडळ केवळ मराठा समाजासाठी असताना अन्य समाजालाही कर्ज दिले जात होते. ते बंद करून केवळ मराठा समाज मर्यादित करण्यात आले. तसेच व्याज परतावा योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर त्यावेळी तीन प्रकारात कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आले. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प कर्ज योजना असे तीन टप्पे असून त्यानुसार काम सुरु झाले आहे. महामंडळाचे काम व योजना मराठा बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा निहाय मेळावे घेत आहे, असे सांगितले.