कणकवली, ता. 6 ः जिल्ह्यातील एका अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्या प्रकरणी चौघांना कणकवली पोलिसांनी आज सातारा येथून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता या सर्वांना 12 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मंगल केशव पाटील (वय 34), राजाराम कृष्णा पाटील (वय 44), सुधीर रामचंद्र पवार (वय 29) आणि दीपक भिकू पवार (वय 43, सर्व रा. आसंनगाव, ता. कराड, जि. सातारा) अशी त्या संशयित आरोपींची नावे आहेत.
जिल्ह्यातील एका गावातून गतवर्षी अल्पवयीन युवतीचे अपहरण झाले होते. यात अपहरणकर्त्यासह अन्य काहींचा सहभाग असल्याची तक्रार त्या मुलीच्या आईने दिली होती. त्यानुसार या सर्वांचा शोध सुरू होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी सातारा जिल्ह्यातील असावेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कोल्हापूर यांनी या तपासाची सूत्रे आपल्या हातात घेतली. दोन दिवसापूर्वी सातारा येथे वरील संशयित चौघांना अटक करण्यात आली. त्यांना येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर आज जिल्हा विशेष न्यायालयात चौकशीसाठी त्यांना हजर करण्यात आले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील अल्पवयीन युवतीवर गेल्या वर्षी अतिप्रसंग झाला होता. या प्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर काही दिवसांनी या युवतीचे अपहरण झाले होते. त्याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर अपहरणकर्त्यांचा शोध सुरू होता.