भाजपाकडुन पोलिस टार्गेट;शहरातील घटनांवर लक्ष नसल्याची टीका…
सावंतवाडी ता.१०: पालिकेच्या कचरा डेपोला काल रात्री लागलेली आग विजविण्यासाठी सावंतवाडीसह वेंगुर्ले पालिकेचा अग्निशमन बंब या ठिकाणी दाखल झाला.दरम्यान पालिकेचे सर्व नगरसेवक कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.मात्र या घटनेबाबत सावंतवाडी पोलीस अनभिज्ञ राहिले,ते त्या ठिकाणी दाखल का झाले नाही ? ,असा सवाल करत पालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना घेराव घातला.दरम्यान या घटनेची कोणतीही माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली नाही.त्यामुळे त्याठिकाणी पोलीस कर्मचारी दाखल झाले नाहीत,असे श्री.धनावडे यांनी सांगितले.दरम्यान या प्रकाराबाबत श्री.परब यांनी नाराजी व्यक्त करत निदान शहरात घडणाऱ्या घटनांबाबत तरी पोलिसांनी जागरूकता दाखवावी,अशा घटनांवेळी कोणाची माहिती देण्याची वाट पाहू नये,असा सल्ला श्री.परब यांनी पोलीस प्रशासनाला दिला.
यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर,नगरसेवक मनोज नाईक,राजू बेग,परीमल नाईक,आनंद नेवगी,सुधीर आडिवरेकर,दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, दीपक म्हापसेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.परब म्हणाले,ही आग आपोआप लागली नाही, तर ती कोणीतरी जाणून बुजून लावली आहे.यात पालिकेचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. आग लावणारी संशयित व्यक्ती सुद्धा आम्हाला माहित आहे.मात्र या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.धनावडे म्हणाले,या घटनेची सविस्तर तक्रार आमच्याकडे दाखल करा,आम्ही याबाबतचा तपास करू,मात्र काल पोलीस प्रशासन त्याठिकाणी पोहोचले नाही, ही आमची चूक नाही, या घटनेची माहिती आम्हाला दिली असती तर तात्काळ त्या ठिकाणी पोलिस दाखल झाले असते असेही त्यांनी सांगितले.दरम्यान याबाबत पालिकेच्या वतीने येथील पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.