प्रशासनामुळे पेच; अन्य ठिकाणी जागा देण्याचा तात्पुरता निर्णय…
सावंतवाडी/निखील माळकर,ता.११: काही स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर बसण्यास नकार दिल्यामुळे सावंतवाडी शहरात आठवडा बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे आज तब्बल बारा वाजेपर्यंत काही व्यापार्यांवर दुकाने लावण्यासाठी जागा शोधण्याची वेळ आली.दरम्यान पालिका प्रशासन व व्यापारी यांच्यात योग्य तो समन्वय नसल्यामुळे हा प्रकार निर्माण झाला.मात्र याबाबत काही नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर तात्पुरती जागा म्हणून त्यांना गांधी चौक परिसरात बसविण्यात आले.परंतु आम्हाला कायमची जागा द्या,अशी मागणी यावेळी व्यापार्यांकडून करण्यात आली.
सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत भरणारा आठवडा बाजार काही वर्षापूर्वी बाजार परिसरात हलविण्यात आला खरा, परंतु आता या बाजाराचा व्याप वाढत असल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी सुरक्षेचे कारण पुढे करून त्या ठिकाणी आपल्या दुकानासमोर दुकाने लावण्यात विरोध केला आहे.गेले चार पाच आठवडे हा प्रकार सुरू आहे.आज सकाळी येथील मारुती मंदिर पासून दोन्ही बाजूने नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी त्याठिकाणी दुकाने लावण्यास व्यापाऱ्यांना विरोध केल्यामुळे पांजरवाडा परिसरात त्यांनी आपली दुकाने थाटली. परंतु त्या ठिकाणीसुद्धा रस्ता अरुंद असल्याचे कारण सांगून तेथील नागरिकांनी विरोध केला.त्यामुळे जावे कुठे ?दुकान लावावेत कुठे ? ,असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला.यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधला,मात्र जागा मिळेल तिकडे बसा,असे काहींकडून सांगण्यात आले.परंतु त्या ठिकाणावर सुद्धा त्यांना उठवण्यात आले त्यामुळे तब्बल साडे अकरा वाजेपर्यंत हे व्यापारी दुकानासाठी जागा शोधत फिरत होते.
आपला माल नाशवंत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आपल्याला पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून आम्हाला योग्य ती जागा द्या,असे त्यांनी सांगितले.दरम्यान याबाबत एका व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता,ते म्हणाले तब्बल तीनशे रुपये आमच्याकडून भाडे घेतले जाते परंतु म्हणावी तशी जागा आणि सुविधा दिली जात नाही,याबाबत पालिका प्रशासनाने योग्य तो तोडगा काढावा,अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यानंतर सर्व व्यापारी एकत्र झाल्यानंतर दुपारी त्यांना गांधी चौक परिसरात मसुरकर क्लिनीक समोर तात्पुरती जागा देण्यात आली,असे पालिकेचे कर्मचारी सदानंद कदम यांनी सांगितले.