नितेश राणे ;पालिका पेपरलेस करण्याबरोबर अग्निशमन बंबाची मागणी पूर्ण करू
सावंतवाडी ता.११: येथील नागरिकांनी फक्त बसून सावंतवाडी कशी घडते ते पहावे,शहराचा चेहरामोहरा ७३० दिवसात बदलण्याचा आम्ही दिलेला शब्द नक्कीच पूर्ण करू,असा विश्वास आज येथे आयोजित कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.दरम्यान सावंतवाडी पालिका पेपरलेस करण्याबरोबरचं पालिकेसाठी अग्निशमन बंब आणि आधुनिक बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे काम पुढील दिवसात पूर्ण करू,असेही त्यांनी यावेळी सांगितले. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कंटेनर थिएटरचे भूमिपूजन श्री.राणे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली,नगराध्यक्ष संजू परब,उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक परीमल नाईक ,मनोज नाईक, दिपाली भालेकर, राजू बेग ,सुधीर आडिवरेकर ,संदीप गावडे ,सिद्धांत भांबुरे ,एकनाथ नाडकर्णी, गुरुनाथ पेडणेकर, परिणीता वर्तक ,देविदास आडकर ,संजू विरनोडकर ,दिलीप भालेकर ,संदीप देसाई, मेघना साळगावकर ,धनश्री गावकर आदी उपस्थित होते.
श्री राणे पुढे म्हणाले, काही दिवसातच पालिकेच्या नाथ पै सभागृहाचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.या ठिकाणी आलेल्या काही कलाकारांकडून यापूर्वी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.त्यामुळे त्यांना यानंतर या ठिकाणी येण्यास नक्कीच भाग पाडू आणि कोकणातील हे एकमेव सभागृह असेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान सावंतवाडीकरांना कदाचित भूमिपूजनाची भीती वाटत असेल, कारण याठिकाणी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते अनेक भूमिपूजन झाली आहेत.मात्र त्याठिकाणी कामाची वीट सुद्धा ठेवण्यात आली नाही,त्यामुळे आम्ही नुसती भूमिपूजने करणार नाही,तर प्रत्यक्षात कामाला सुद्धा सुरुवात करू, आणि लवकरच याठिकाणी कंटेनर थिएटर उभे राहील, असे त्यांनी सांगितले.