Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ल्यातील पाणीटंचाईसाठी निवारणासाठी ६८ लाख...

वेंगुर्ल्यातील पाणीटंचाईसाठी निवारणासाठी ६८ लाख…

दीपक केसरकर; आढावा बैठकीत मंजुरी….

वेंगुर्ले.ता.१५: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग तर्फे आज वेंगुर्ले तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा बनविण्यासाठी आढावा सभा आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत शासनास पाठविण्यात येणारा ६७.७० लाख रुपयांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यात आला.
वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, तहसीलदार प्रविण लोकरे, जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, दादा कुबल, पं. स. सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी श्रीपाद पाताडे, प. स. सदस्य यशवंत परब यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.
प्रथम श्री. पाताडे यांनी मागील गतवर्षीचा पाणीटंचाई आराखडा व झालेली कामे याबाबत माहिती दिली. गतवर्षी मंजूर केलेल्या नळयोजना विशेष दुरुस्तीतील ९ कामांपैकी ४ कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत. तात्पुरती पूरक नळयोजना २ कामांपैकी १ काम प्रगतीपथावर तर एका कामास कार्यरंभ आदेश प्राप्त नाही. विंधन विहीर एकूण ५ कामांपैकी १ काम पूर्ण आहे,२ कामे बक्षिसंपत्र झाली नाहीत,२ कामे झालेली नाहीत. विहीर खोल करणे व गाळ काढणे या ९ कामांपैकी फक्त ३ कामे झाली असून ६ कामे झालेली नाहीत. एकूण ३८ कामांपैकी १७ पूर्ण व ५ कामे मार्चपूर्वी करण्याचे नियोजित असल्याचे सांगितले.
याबाबत बोलताना जि. प. सदस्य दादा कुबल म्हणाले की गतवर्षी मंजूर झालेल्या कामांना जो निधी मंजूर झाला होता,तो निधी १ वर्षानंतर काम सुरू केल्यास वाढणार आहे,त्याला जबाबदार कोण? ज्यावर्षीची कामे त्याच वर्षी होण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे,असे सुचविले. या विषया नंतर जर कुणाच्या समस्या असल्यास त्या मांडाव्यात,असे केसरकर यांनी सांगितले असता, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत म्हणाले की, विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भुवैज्ञानिक आयत्या वेळी फेटाळतात, ते मात्र या सभेला का उपस्थित राहत नाहीत?असे विचारले असता केसरकर यांनी पुढच्या वेळी त्यांना बोलविण्यात येईल,असे सांगितले. आजची ही टंचाईची आढावा बैठक घेत असताना निधीची तरतूद आहे का, ते प्रथम सांगावे.मागे परबवाडा ग्रा. प. मधील १ काम मंजूर केले, मात्र त्याला निधी आला नव्हता,मात्र ग्रा. प. ने ते ठेकेदारमार्फत करून घेतले. त्यावेळी ठेकेदारालाच पैशासाठी ग्रा. प. कडे वारंवार खेपा माराव्या लागल्या, अशी परिस्थिती नाही ना, असे परबवाडा सरपंच पपू परब यांनी विचारले. त्यावर पाताडे यांनी यावर्षी निधी असल्याचे सांगितले. यानंतर खानोली, होंडावडा, आडेली, वेतोरे, कुशेवाडा, रेडी या भागतिलही सरपंचांनी टंचाईच्या समस्या मांडल्या. यावर बोलताना केसरकर म्हणाले की,तिलारीची नळपाणी योजना वर्ष अखेर पर्यंत वेंगुर्ले पर्यंत येणार आहे. त्याचा फायदा वेंगुर्ल्याला होईल.तसेच टंचाईतील कामांसाठी लागणारी जमीन बक्षीसपत्राने करताना येणाऱ्या अडचणी आणि खनिकर्म भागातील जमीनीबाबत आपण ग्रामविकास मंत्री, महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू,असे सांगितले. दरम्यान जि. प. अध्यक्ष समिधा नाईक यांनी बोलताना वेंगुर्ले तालुक्यातील पाणीटंचाईबाबत ज्या अडचणी असतील त्या जि. प. पर्यंत आणाव्यात. त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील,असे सांगितले.सभेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार सभापती अनुश्री कांबळी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments