उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला…
ओरोस ता. १७ : पुन्हा निवडणुका घेवून दाखवा ? असे खुले आव्हान भाजपने दिले आहे. त्यामुळे त्यांना आता समजले आहे की आघाडी सरकार कोसळू शकत नाही असा टोमना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते सिंधुदुर्गनगरी येथील महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेतला. यानंतर सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषि भवन येथे त्यांचा आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खा विनायक राऊत आ. वैभव नाईक आ. दीपक केसरकर यांच्यासह राष्टवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, गौरीशंकर खोत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रवीण भोसले, व्हिक्टर डांटस, संदेश पारकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस एकत्र येण्याचा उत्सव मोठा आहे. यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. कशामुळे ते आता बोलणार नाही. वेळ आली की निच्छित सांगेन, असे सांगितले. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकजुटिने एकत्र आले यात आनंद आहे. एकजुटिने काम केल्यास पक्ष मोठे होतात, असेही त्यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने भाजपला ते पचनी पडलेले नाही. भाजप आमच्या सरकारवर सारखी टिका करत हे सरकार लवकरच कोसळणार, असे जनतेला भासवत आहे. कालतर एका ठिकाणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका घेवून दाखवा ? असे खुले आव्हान दिले आहे. यावरून आमचे सरकार टिकणार असल्याचे भाजपने अप्रत्येक्ष मान्य केल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीला कधीही तडा जाणार नसल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आढावा बैठकीत प्रत्येक मतदार संघातील प्रश्न समजावून घेतले. शेतकरी, उद्योग धंदे, घर बांधणी या प्रमुख प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेतले गेले. ही जिल्ह्याचा आढावा घेण्याची आपली नवीन पद्धत असून याच माध्यमातून विकासाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. आरोग्य विषयावर बोलताना ट्रामा केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय कॉलेज उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सर्वांचे आशीर्वादाने पुढे जायचे आहे. सर्वांनी वातावरण हसत-खेळत ठेवा. त्यातून महाराष्ट्र घडवूया, असे त्यांनी आवाहन केले.