राजन तेली; यापुढे भाजपाची सत्ता येण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा…
वेंगुर्ले ता.१८: भाजपाच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प आणण्यात आले,परंतु ते रद्द करण्याचा कुटील डाव आताचे शासन करत आहे,असा आरोप आज येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी केला.दरम्यान या ठिकाणी आगामी काळात होणाऱ्या निवडणुका सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा.अन्यथा जिल्हा विकासात मागे राहील,अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भाजपा वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी बैठक मंगळवारी साई मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती निलेश सामंत, नगरसेवक धर्मराज कांबळी, शितल आंगचेकर, साईप्रसाद नाईक, ऍड.सुषमा प्रभुखानोलकर, परबवाडा सरपंच पप्पू परब, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, वसंत तांडेल, बाबली वायगणकर, प्रशांत प्रभुखानोलकर व पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले की, या जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार असताना चांदा ते बांदा योजनेचा सद्यस्थिती काय, कर्जमाफीचा कोणाला उपयोग झाला काय, तसेच विकासकामांना स्थगिती का? कोकणच्या विकासासाठी आलेल्या प्रकल्पांना शिवसेनेनेच विरोध केला. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाने विविध विकासकामांना मंजुरी दिली होती. विविध ठिकाणची रस्त्यांची कामे मंजूर झाली होती. परंतु दीपक केसरकर यांनी केलेली कामाची भूमिपूजनाना स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत संघटना मजबुतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा,असे त्यांनी सांगितले. आगामी ग्रा.प.,जि. प.तसेच विकास सोसायटीच्या निवडणुका स्वबळावर भाजपाने जिंकल्या पाहिजेत. यासाठी तालुका, गावस्तरावरील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शरद चव्हाण, दिलीप गिरप, सुषमा प्रभुखानोलकर यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान तालुक्याच्या वतीने राजन तेली यांचा शरद चव्हाण यांच्या हस्ते शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.