विनायक राऊत :मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले
कणकवली, ता.१९: सीवर्ल्ड आणि चिपी येथील विमानतळ प्रकल्प नारायण राणे यांच्या चुकीच्या धोरणामुळे रखडले आहेत असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौर्यामुळे सिंधुदुर्गातील अनेक प्रश्नांना चालना मिळाल्याचीही माहिती त्यांनी दिली.
येथील विजय भवन येथे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राणेंना चांगल काही दिसतच नाही. त्यामुळे ते करत असलेल्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. श्री.राऊत यांच्यासोबत युवानेते अतुल रावराणे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
श्री.राऊत म्हणाले, आमचा सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोध नव्हता. मात्र 300 एकर ऐवजी 1300 एकर एवढी जागा घेतली जात असल्याने आम्ही विरोध केला. प्रकल्प 300 एकरात झाल्यानंतर उर्वरीत 1 हजार एकर जागा आपल्या घशात घालण्याचा राणेंचा डाव होता तो आम्ही उधळून लावला. चिपी येथील विमानतळ पूर्णतः सरकारच्या ताब्यात असायला हवा होता. राणेंनी हा विमानतळ सरकारी-खासगी भागीदारी अंतर्गत खासगी कंपनीकडे दिला. या कंपनीने विमानतळ होण्यासाठी फारशी कार्यवाही केली नाही. त्यामुळे विमानतळाचे काम अजूनही रखडले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौर्यामुळे सिंधुदुर्गातील अनेक प्रश्न सुटले आहेत. यात मसुरे-आंगणेवाडी येथील 23 कोटींच्या लघुसिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मच्छिमारांना गेली चार वर्षे डिझेल परतावा मिळाला नव्हता. हा परतावा पुढील आठवड्यापासून मिळणार आहे. पर्ससीन नेट आणि एलईडी फिशींगबाबत लवकरच अधिवेशनात कायदा होणार आहे. विदर्भाप्रमाणे चक्राकार पद्धतीने आरोग्य, सार्वजनिक बांधकाम व इतर खात्यांमध्ये पदभरती होणार आहे. 1500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरबांधणीचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी मुळे राज्यातील 35 लाख शेतकर्यांचा सातबारा कोरा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व तलावांमध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन होणार असून यात मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार मिळेल अशी ग्वाही देखील श्री.राऊत यांनी दिली.
——-.