प्रशासना विषयी नाराजी;आठही तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश…
ओरोस,ता.२०: जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार २० फेब्रुवारी उलटला तरी झालेला नाही. जिल्हा परिषदच्या अन्य विभागांचे पगार झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाच्या निकषानुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणे बंधनकारक आहे. मात्र, २० फेब्रुवारी होवून गेली तरी जानेवारी महिन्याचा पगार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा झालेला नाही. याचवेळी जिल्हा परिषदेच्या अन्य विभागांचे पगार झालेले आहेत. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालयासह आठही तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
कोकणची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची प्रसिद्ध जत्रा १७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील दूसरी कुणकेश्वरची प्रसिद्ध जत्रा होत आहे. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी कुटुंबासह जातात. मात्र, पगार न झाल्याने यावर्षी हे कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहे. आता सलग तीन दिवस सुट्टी आली आहे. त्यामुळे २४ तारीख नंतर पगार जाणार आहेत. यामागे कोणाचा हलगर्जीपणा आहे. त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांतून होत आहे.