माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर ; सुधारित आराखडा रद्द न झाल्यास पालिकेवर मार्चमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचा इशारा…
मालवण, ता. २० : मालवण पालिकेचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिकेच्या निवडणुकीपूर्वी शहर विकास आराखडा रद्द करून तो अरबी समुद्रात बुडविला जाईल असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात हा आराखडा रद्द करण्यास ते अपयशी तसेच नाकर्ते ठरले. विकास आराखडा रद्द करण्याची धमक, बौद्धिक क्षमता नगराध्यक्षांमध्ये नाही. त्यामुळे आराखडा अरबी समुद्रात बुडविता बुडविता नगराध्यक्षांनाच समुद्रात बुडवावे लागते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आराखड्यातील १८ मीटरच्या रस्त्यांमुळे शेकडो कुटुंबीय उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे हा शहर विकास आराखडा रद्द करण्यात यावा अन्यथा मार्च महिन्यात पालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मालवण तालुका भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, नगरसेवक आप्पा लुडबे, पूजा सरकारे, जगदीश गावकर, आबा हडकर, मोहन वराडकर, अवी सामंत, जाबीर खान, महेश गिरकर, विद्या मेस्त्री यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. आचरेकर म्हणाले, हरिहरेश्वर मंदिर ते गंवडीवाडा मच्छीमार्केटपर्यत जाणारा रस्ता फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या जनसुनावणीत रस्ता रद्द करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी या रस्त्याला विरोध केला होता. रस्ता हटविल्यानंतर सुधारित आराखडाही पालिकेकडे आला होता. आम्ही आक्षेप घेतल्यानंतर हा रस्ता रद्द करण्यात आला. या आराखड्याची प्रत पालिकेत गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र त्यानंतर मंत्रालयात नगरविकास विभागात झालेल्या बैठकीत नगराध्यक्षांनी स्वतः त्याठिकाणी पुन्हा रस्ता घालण्याचा घाट घातला. यात मोठे अर्थकारण झाले होते. या बैठकीस जाण्यापूर्वी ५० लाखाची सुपारी घेण्यात आली. त्यामुळेच संबंधित बिल्डर कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता होणारच असे ठामपणे सांगत होता. या बैठकीला जाण्यापूर्वी नगराध्यक्षांनी मोठे पॅकेज घेतल्याची चर्चाही शहरात होती. या बैठकीला अन्य लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. या रस्त्यामुळे हरिहरेश्वर मंदिर ते गवंडीवाडा या भागातील सुमारे ६० हून अधिक कुटुंबांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम नगराध्यक्षांनी केले आहे. असा आरोप त्यांनी केला.
फोवकांडा पिंपळ ते जेटी हा रस्ता ९ मीटरचा होता. मात्र नव्याने जाहीर केलेल्या आराखड्यात हा रस्ता १८ मीटरचा टाकण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत. या भागातील नाल्यावरूनही रस्ता दाखविण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामांवरून अनेक कुटुंबांना बेघर करण्याचे दुष्कृत्य सत्ताधारी शिवसेना करत आहे. या रस्त्यांसाठी महामार्गाचे निकष लावले जात आहेत. जाणूनबुजून आचरेकर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचा आरोप श्री. आचरेकर यांनी केला. मालवण भरड बाजारपेठ हा मार्ग ९ मीटरचा ठेवण्यात आला आहे. शहरवासियांचा छळ करण्याचे काम सत्ताधारी शिवसेनेने सुरू केले आहे. जोशी वाड्यातील ३० कुटुंबे उद्ध्वस्त करण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे. रामेश्वराच्या गादीवरूनही रस्ता दाखविण्यात आला आहे. त्याचबरोबर वायरी, दांडी, देऊळवाडा, आडवण येथील ग्रीन झोन कायम ठेवला असून ०.३३ एफएसआय ०.२ वर आणून ठेवण्यात आला आहे. यामुळे या भागातील नागरिक आपली शेकडो वर्षापूर्वीची घरेही दुरुस्त करू शकणार नाहीत. लोकांनी अभ्यासू नगराध्यक्ष म्हणून महेश कांदळगावकर यांना निवडून दिले. मात्र नगराध्यक्षांना कोणताही अभ्यास नसल्याचे यावरून दिसून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सुधारित शहर विकास आराखड्यास स्थगिती देऊन पुर्नसर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत. या आराखड्यास स्थगिती न दिल्यास मार्च महिन्यात पालिकेवर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही श्री. आचरेकर यांनी दिला.