भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग:सरकारच्या कारभाराचे भजनातून वाभाडे
कणकवली, ता.२५: शेतकर्यांची कर्जमाफी, महिलांवरील अत्याचार, खावटी कर्जातून झालेली शेतकर्यांची फसवणूक, विविध विकास कामांना स्थगिती या विरोधात आज कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात भजनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले.
कणकवलीतील धरणे आंदोलनावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बाळा जठार, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, प्रज्ञा ढवण, प्रकाश सावंत, रवी शेट्ये, मनोज रावराणे, प्रकाश सावंत, सुहास सावंत, बबलू सावंत, सुशील सावंत, अण्णा कोदे, किशोर राणे, संतोष राणे, मंगेश तळगावकर, पंढरी वायंगणकर, विठ्ठल देसाई,आनंद घाडीगावकर, संजीवनी पवार, प्राची कर्पे आदी उपस्थित होते.
खावटी कर्ज माफ करण्याचे आश्वासन महाविकास आघाडी सरकार दिले होते. पण त्याची कार्यवाही झालेली नाही. याखेरीज जिल्ह्यातील बहुतांश विकासकामांना स्थगिती देऊन आघाडी सरकार कोकणावर सूड उगवत आहे. या सरकारचा आम्ही निषेध करत असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले. यानंतर ‘उद्धवा अजब तुझे सरकार….हे सरकार आमचे नाय..माणसाला मानत नाय…‘ आदी प्रतिकात्मक भजने म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.