साईप्रसाद कल्याणकर; आरटीओकडे मागणी १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन….
बांदा.ता,२५: बांदा कट्टा कॉर्नर सर्कल व सातार्डा चेकपोस्टवर मोबाईल स्केल व्हॅन बसविण्याबाबत आरटीओ विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. गेली १२ वर्षे यासाठी पाठपुरावा करुनही केवळ कार्यवाहीची लेखी आश्वासने दिली जात आहेत. विभागाच्या चालढकल कारभारामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत आहे. येत्या १५ दिवसात ठोस कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २००८ मध्ये बांदा सटमटवाडी येथे सीमा तपासणी नाक्यासाठी ३२ एकर जमीन अवजड वाहन तपासणीसाठी संपादित करण्यात आली. सदर जागा सीमा तपासणी नाक्यासाठी अयोग्य असल्याचे सांगून शेतकर्यांनी आंदोलने उभारली. मात्र शेतकर्यांची आंदोलने चिरडून टाकण्यात आली व हेकेखोरपणे भूसंपादन करण्यात आले.
आंदोलनावेळी वाहन गळतीवर उपाय म्हणून बांदा सर्कल व सातार्डा येथे मोबाईल स्केल व्हॅन उभारण्याचे लेखी आश्वासन दिले होते. गेल्या १२ वर्षात कार्यवाही मात्र शुन्य आहे. त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल पाण्यात जात आहे. मोबाईल स्केल मशीन उभारण्याची १५ दिवसात कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कल्याणकर यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
फोटो:-
साईप्रसाद कल्याणकर