उभाबाजार येथील घटना; स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत,त्यांना लावले हाकलून…
सावंतवाडी ता.२५: आठवडा बाजारात जागेवरून पालिका प्रशासन आणि विक्रेते यांच्यात गेले काही दिवस सुरू असलेले वाद आज विकोपास गेले.बाजार बंद करून घरी जाण्याच्या वेळेस आपली जागा दुसऱ्याने बळकावल्याच्या रागातून दोघे विक्रेते एकमेकाला भिडले.यातून तब्बल चार ते पाच जणांनी एकमेकांना मारहाण केली.हा प्रकार आज साडेदहा वाजण्याच्या सुमारास येथील मंगळवारच्या बाजारपेठेत घडला.
दोन्ही बाजूने वारंवार अंगावर जाण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक नागरीकांनी आक्रमक भूमिका घेत,या प्रकरणावर तोडगा काढला.दोन्ही बाजूच्या विक्रेत्यांना हाकलवून लावले.शहरात शांतता असताना अन्य ठिकाणांहून येणाऱ्या व्यक्तींकडून दादागिरी नको,असे नागरिकांचे म्हणणे आहे. सावंतवाडी शहरात बाजारपेठेसाठी येणाऱ्या विक्रेत्यांना जागा देण्यावरून पालिका प्रशासन व विक्रेते यांच्यात गेले काही दिवस शीतयुद्ध सुरू होते.सोनार गल्ली तसेच उभा बाजार परिसरातील जागा त्यांना न देता अन्य बोळात व अंतर्गत रस्त्यात त्यांनी बसावे,अशी मागणी काही व्यापाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी केली.त्यामुळे नगरपालिकेचे त्यांना जागा ठरवून दिली होती.तसेच काही जागा आखून दिली होती.ही जागा जास्त घेतल्यावर हा वाद झाल्याचे समजते.