साई मंगल कार्यालयाकडून होणार प्रारंभ : सुमारे २००० नागरिकांचा असणार सहभाग
वेंगुर्ले.ता.२७: नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅली वेंगुर्ले येथे २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता साई मंगल कार्यालय येथून निघणार आहे. ही रॅली दाभोलीनाका,मार्केट मार्गे मारुतीमंदिरा कडून जाऊन रामेश्वर मंदिर येथे समाप्त होणार आहे. या तिरंगा रॅलीत १५०० ते २००० नागरीक सहभागी होणार आहेत.
भारतीय सुरक्षा मंचच्या वतीने आयोजित वेंगुर्लेतील या तिरंगा यात्रेला वेगवेगळय़ा संघटना, संस्था, विविध समाज बांधव मंडळी, युवक मंडळे यानी पाठिबा दिला आहे. गेले पंधरा दिवस गावागावात जाऊन या बाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचाहि पाठिबा मिळत आहे. सुरुवातीला बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालया पासून रॅलीचे नियोजन होते परंतु सध्या बारावीच्या होणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रॅलीचा मार्ग साई मंगल कार्यालय येथून करण्यात आला आहे.
रॅली सुरू होण्यापूर्वी साई मंगल येथे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी हे सी. ए. ए. बाबत समज व गैरसमज याबाबत मार्गदर्शन करणार आहेत व त्यानंतर रॅलीला सुरुवात होणार आहे.
कायद्याविषयी योग्य माहिती न समजल्यामुळे काहि समाज घटकांकडून या कायद्याला विरोध केला जात आहे, हे पूर्णपणे चुकीचे असून देशाच्या अखंडता व एकतेला धोकादायक आहे. यासाठी सर्व लोकांपर्यंत कायद्यासंदर्भातील योग्य माहिती पोहोचवण्यासाठी त्यांच्या मनातील गैरसमज दूर होण्यासाठी जास्तीत जास्त देशभक्त नागरीकांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन तिरंगा यात्रा यशस्वी करावी असे आवाहन भारतीय सुरक्षा मंचच्यावतीने करण्यात येत आहे.