शिवसेना तालुकाप्रमुख खोबरेकर यांची टीका ; महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांचा अभिमान…
मालवण, ता. २९ : महाविकास आघाडीच्या विरोधात जिल्ह्यात भाजपच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनांना जनाधारच नसल्याचे दिसून येत आहे. स्वतःच्या तत्कालीन सरकारच्या अपयशी कारकिर्दीविरोधातच भाजपची ही आंदोलने सुरु असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकारने अनेक रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठवल्याने विकास कामांना वेग आला आहे. त्यामुळे भाजपने आपली नौटंकी यापुढेही अशीच सुरू ठेवावी आम्ही विकासाची कास धरत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तडीस लावू असेही त्यांनी सांगितले.
मालवण तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक मंदार केणी, दीपक देसाई आदी उपस्थित होते. श्री. खोबरेकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच अधिवेशनात शेतकरी, नोकरदार वर्ग आणि मराठी माणसांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. मात्र अशा परिस्थितीत भाजप कडून स्टंटबाजीची आंदोलने सुरू आहेत. मात्र त्यांच्या या आंदोलनांना जनाधारच नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी आपली ही नौटंकी अशीच सुरू ठेवावी. महाविकास आघाडी सरकार कडून येत्या काळातही जनतेच्या हिताचेच काम केले जाईल.
मत्स्यव्यवसाय विभागाची मत्स्योत्पादन मोजण्याची पद्धत चुकीची आहे. त्यामुळेच मत्स्यदुष्काळ जाहीर करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात छोटे व मोठे मच्छीमार यांची वर्गवारी व्हायला हवी आणि त्यांच्यामाधून होणारी मासेमारी याचे मोजमाप व्हायला हवे तरच मत्स्योत्पादनातील घट दिसून येईल. त्यामुळे अशी मच्छीमारांची वर्गवारी करण्यात यावी यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही भूमिका मांडली जाणार असल्याचे श्री. खोबरेकर यांनी सांगितले. मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी मत्स्यदुष्काळा संदर्भात जी समिती नियुक्त करण्याची घोषणा केली. त्यात अशासकीय सदस्य म्हणून मच्छीमार प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा अशी मागणीही केली जाणार असल्याचे बाबी जोगी यांनी सांगितले.
उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आमदारांनी सातत्याने पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा यासाठी विधीमंडळात आवाज उठविला. मच्छीमारांना मंत्रालयात नेत त्यांचे प्रश्न थेट संबंधित मंत्र्यांपर्यंत पोचविण्याचे काम केले. त्यामुळेच आज अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत त्यामुळे असा आमदार होणे नाही असे सांगत बबन शिंदे यांनी आमदार नाईक यांचे कौतुक केले.