शैलेश भोगले; रिफायनरीची अधिसूचना गेल्यावर्षीच रद्द…
कणकवली, ता.३: नाणार प्रकल्पाच्या मुद्दयावरून भाजपची मंडळी खासदार विनायक राऊत यांना मारण्याची भाषा बोलत आहेत. खासदार राऊत यांना मारण्याची बात सोडाच साध्या शिवसैनिकाला तरी हात लावून दाखवा असे आव्हान शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी आज येथे दिले. तसेच नाणार येथील रिफायनरीची अधिसूचना गेल्यावर्षीच रद्द झाली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत तेथे रिफायनरी होणार नाही असेही ते म्हणाले.
श्री.भोगले शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बोलत होते. त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, संदेश पटेल, राजू राठोड, गोट्या कोळसुलकर, विलास गुडेकर, महेश कोदे आदी उपस्थित होते. श्री.भोगले म्हणाले, रिफायनरीच्या समर्थनार्थ भाजपच्या काही मंडळींनी डोंगरतिठा येथे सभा घेतली. या सभेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह काही मंडळींनी खासदार राऊतांना मारण्याची भाषा वापरली आहे. मात्र अशी भाषा शिवसैनिक खपवून घेणार नाहीत. जठार यांना जशासतसे उत्तर द्यायला शिवसैनिक समर्थ आहेत.
ते म्हणाले, रिफायनरी समर्थनाची सभाच बोगस होती. नेपाळी कामगारांना शिवसेनेचे गमजा घालून आणण्यात आले होते. तसेच नाणार रिफायनरीची अधिसूचना गेल्या वर्षीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रद्द केली होती. जर पुन्हा रिफायनरी प्रकल्प आणायचा झाला तर नव्याने तशी अधिसूचना काढावी लागणार आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाहीच असे स्पष्ट केले आहे. तरीही प्रमोद जठार हे शिवसेनेला प्रकल्प हवा आहे असे सांगून तेथील जनतेची दिशाभूल करत आहेत.
नाणार परिसरात गुजरातमधील अनेक उद्योजकांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांची दलाली श्री.जठार करत असल्याचा आरोप शैलेश भोगले यांनी केला.