संजय पडतेंची नागराध्यक्षांवर टीका; जिमखाना मैदानावर बाजार भरल्यास महाविकास आघाडीचा विरोध…
सावंतवाडी ता.०४: शहराची शांततेची घडी बिघडवण्याचे काम नगराध्यक्ष संजू परब करीत आहेत,ज्या जनतेने निवडून आणले,त्याच जनतेला आता ते धमकी देऊ लागले आहेत.त्यामुळे हीच जनता त्यांना कधी रस्त्यावर आणेल,हे त्यांना सुद्धा करणार नाही,असा टोला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी आज येथे लगावला.श्री.परब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सावंतवाडी व्यापारी संघाच्या अध्यक्षांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत टीका केली होती.त्या टीकेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.याप्रसंगी ते बोलत होते.दरम्यान यापुढे हा बाजार जिमखाना मैदानावर भरवल्यास प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे,शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते,शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ,जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे,रश्मी माळोदे, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री पडते पुढे म्हणाले, व्यापाऱ्यांना धमकी देणे हे नगराध्यक्ष पदाला अशोभनीय आहे. त्यांनी कणकवलीचे राजकारण या ठिकाणी करू नये,सावंतवाडी शहराला शांततेत काम करणारेच नगराध्यक्ष लाभले आहेत.आणि त्यांनी जनतेशी हितगूज करून जनतेच्या हिताची कामे केली आहेत.त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व ग्राहकांचा विचार करता हा बाजार शहराच्या मध्यभागी असणे गरजेचे आहे. आणि तो तसा भरल्यास ग्राहकांची सुद्धा धावपळ होणार नाही,असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, नगराध्यक्षांनी हा बाजार जिमखाना मैदानावर भरवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्याचे आम्ही समर्थन करत नाही. यापुढे हा बाजार पुन्हा त्याठिकाणी भरल्यास आम्ही शिवसेनेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करू,मात्र येथील व्यापाऱ्यांना व ग्राहकांना योग्य तोच न्याय देऊ,असे त्यांनी सांगितले.