Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशहर विकास आराखड्या बाबतचा ठराव मंजूर, उपसूचना फेटाळली...

शहर विकास आराखड्या बाबतचा ठराव मंजूर, उपसूचना फेटाळली…

शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या टीकेमुळे सभेत प्रचंड गदारोळ ; हरिहरेश्वर रस्ता आराखड्यातून काढल्याशिवाय राहणार नाही-कांदळगावकर

मालवण, ता. ५ : शहर विकास आराखड्याबाबत आज झालेल्या विशेष सभेत ठराव आणि उपसूचना मांडण्यात आली. शिवसेनेकडून मांडलेला ठराव १० विरूद्ध ६ मतांनी मंजूर करण्यात आला. तर भाजपची उपसूचना १० विरूद्ध ६ मतांनी फेटाळण्यात आली. यात नगरसेविका पूजा करलकर आणि ममता वराडकर यांनी तटस्थतेची भूमिका घेतली.
शहर विकास आराखड्यावर निर्णय घेण्यासाठी आज झालेली विशेष सभा आरोप-प्रत्यारोपांमुळे वादळी झाली. शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विशेष सभेचे कामकाज पाहण्यासाठी शहरातील नागरिकही उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहून नगरसेवक एकमेकांवर टीका करत असल्याचे दिसून आले. भाजपकडून सुदेश आचरेकर, राजू वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पूजा सरकारे यांनी तर शिवसेनेकडून मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके आणि स्वत: नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आक्रमकपणे शहर विकास आराखड्यावर आपली भूमीका मांडली. शहरातील हरीहरेश्‍वर मंदिरपासूनचा रस्ता या आराखड्यातून काढल्याशिवाय राहणार नाही असेही कांदळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सभेच्या सुरवातीस सुदेश आचरेकर यांनी शहर उद्ध्वस्त करणार्‍या विकास आराखड्यात शिवसेनेने बदल केल्याचा आरोप केला. दुरूस्त होवून आलेला विकास आराखडा याच सत्ताधार्‍यांनी आठ महिने लपवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर राजन वराडकर यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीला मुख्याधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आप्पा लुडबे व गणेश कुशे यांनी शहर विकास आराखड्याची अधिसूचना निघालेली असल्याने त्यावर पुन्हा हरकती घेण्याचा अधिकार आहे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर नगराध्यक्षांनी राज्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शहर विकास आराखड्यात बदल करण्याची जबाबदारी आमची असल्याचे स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत मंदार केणी यांनी तत्कालीन सत्ताधार्‍यांवर आणि विद्यमान पदाधिकार्‍यांवर टीका केल्याने शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
नगराध्यक्षांनी २ मार्च रोजी शासनाकडे पत्र देऊन मालवण पालिकेला सादर केलेल्या अन्यायकारक विकास आराखड्याबाबत आराखड्याचे पुनर्विलोकन करून पालिकेच्या गरजा, सूचनांनुसार व मालवणचा शाश्‍वत विकास होईल असा आराखडा करण्याचे आदेश नगररचना विभागास द्यावे असे कळविले होते. या पत्राच्या अनुषंगाने ३ मार्च रोजी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, नगरविकास अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीच्या दरम्यान राज्यमंत्र्यांनी आराखड्यात जे अपेक्षित बदल आवश्यक आहेत त्याबद्दल आपले स्तरावर नागरिकांकडून हरकती घेऊन त्यावर सुनावणी करून तसा बदल आराखड्यात करावा व त्यास नगरपालिका सभेची मंजुरी घेऊन शासनाकडे सादर करावा अशा सूचना केल्या आहेत. त्या सुचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, असा ठराव मंदार केणी यांनी मांडला, तो मंजूर करण्यात आला.
भाजपकडून शहर विकास आराखडा मंजूर केल्याबाबत काढलेली अधिसूचना रद्द करून मालवणच्या जनतेच्या सूचना घेवून नव्याने विकास आराखडा बनविण्यात यावा, अशी उपसूचना भाजप नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केली. ही उपसूचना ६ विरूद्ध १० मतांनी फेटाळण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments