पितळ उघडे पडेल म्हणूनच बोलू दिले नाही ; नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची टीका…
मालवण, ता. ६ : शहर विकास आराखड्याबाबत काढलेला मोर्चा हा राजकीय हेतूने होता. त्यामुळेच शहरातील सुजाण नागरिकांनी या मोर्चाकडे पाठ फिरविली. दोनशे लोक मोर्चात सहभागी झाले यात काही शहराच्या हद्दीबाहेरचे होते. ज्यांनी हा आराखडा बनवून शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला तेच सुदेश आचरेकर या मोर्चाचे नेतृत्व करत होते अशी टीका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली. आमची भूमिका पहिल्यापासून नागरिकांच्या बाजूने होती आणि यापुढेही नागरिकांच्या बाजूने राहील असेही नगराध्यक्षांनी सांगितले.
मोर्चानंतर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अरविंद मोंडकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्यावर जोरदार टीका केली. शहर विकास आराखडा अन्यायकारक आहे, तो रद्द करा असे जे बोंबा मारून सांगत आहेत, त्यांनीच हा आराखडा बनविला आहे. शासनाकडे हा आराखडा पाठविला त्यावेळी सूचक म्हणून सुदेश आचरेकर व अनुमोदन म्हणून महेश जावकर यांचे नाव आहे. त्यामुळे आता राजकीय हेतूने ओरडण्यापेक्षा त्यावेळीच आपल्या सत्ताकाळात प्रभागनिहाय बैठका घेऊन जनतेला अपेक्षित आराखडा त्यांनी बनवायला हवा होता. मात्र त्याची कार्यवाही त्यांनी केली नाही. नागरिकांनी या आराखड्याबाबत थेट आपल्याशी संपर्क साधावा कोणत्याही राजकीय पक्षाच्या कुबड्या त्यांनी घेऊ नये. तुमचा प्रतिनिधी म्हणून मी खुर्चीवर बसलो आहे. शेवटपर्यंत जनतेसोबतच राहणार असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पालिकेवर काढलेला मोर्चाला ना नागरिकांचा पाठींबा होता ना भाजप नगरसेवकांचा पाठींबा होता. उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे हे मोर्चात सहभागी नव्हते. कालही पालिकेच्या विशेष सभेत भाजपच्या नगरसेविका पूजा करलकर, ममता वराडकर या भाजप सोबत राहिल्या नाहीत. त्यामुळे सुदेश आचरेकर यांच्यासह विरोधकांनी आराखड्यावरून सुरू असलेले राजकारण थांबवावे असाही टोला नगराध्यक्षांनी लगावला.
आचरेकर, मोंडकर, जावकर यांच्यासह अन्य काहीजणांनी आराखड्याविरोधात पालिकेवर मोर्चा काढला. त्यावेळी जनतेला दिशाभूल करणारी वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आली. मात्र, त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडत असताना आपले पितळ उघडे होईल या भीतीनेच विरोधकांनी मला बोलायला दिले नाही. मोर्चातील नागरिकही नगराध्यक्ष बोला असे सांगत असतानाही विरोधक दिशाभूल करत राहिले. असेही नगराध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले.
याच दरम्यान मोर्चात सहभागी झालेल्या प्रभाग सात व आठमधील नागरिकांनी नगराध्यक्ष कांदळगावकर यांची भेट घेत निवेदन सादर केले.