के.मंजुलक्ष्मी; सरकारी कार्यालयातील पत्रव्यवहार ई-मेलच्या माध्यमातून करा…
सिंधुदुर्गनगरी.20: जिल्हावासियांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये जे काही पत्रव्यवहार करावयाचे असतील ते ई-मेलच्या माध्यमातून करावे. सर्व कामे दूरध्वनी वरून करावीत. कोणत्याही प्रकारचे निवेदन देण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये न येता निवेदने ई-मेलने पाठवावीत. थेट भेटीसाठी येणे टाळावे. अत्यंत महत्वाच्या कामा व्यतिरिक्त शासकीय कार्यालयांमध्ये येऊ नये. तसेच घरातून बाहेरही पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. शासकीय कार्यालयातील कामकाजासाठी कार्यालयांमध्ये एक हेल्प डेस्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या लोकांना घरीच किंवा प्रशासनाने ठरविलेल्या एखाद्या संस्थेत निरीक्षणा खाली ठेवण्यात येत आहे. या ज्यांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे त्यांच्यासाठी पुढील प्रमाणे सूचना आहेत. घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तींने हावेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास, बाथरूम जोडलेले आहे. अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीत राहणार असतील तर त्यांनी रुग्णांपासून किमान 1 मीटर अतंरावर रहावे. परदेश दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे. पदेश दौऱ्यावरून आल्यानंतर 14 दिवस 104 क्रमांकावर आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक आहे. कोरोना सदृष्य आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वतःहून नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी करावी व आवश्यकतेनुसार भरती व्हावे. घरातील वृद्ध, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीने घरातील वावर समिती ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणे कटाक्षाणे टाळावे. अशा व्यक्तीने पूर्व नियोजित सभा, न्यायालयिन कामकाज इत्यादी बाबत वेळीच संबंधित अधिकारी यांना कळवून सदर सभांना, न्यायालयीने कामकाजांना गैरहजर राहणार असल्याची परवानगी घ्यावी. अल्कोहोल युक्त हॅन्ड सॅनीटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थित हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी, इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये. पूर्णवेळ सर्जिकल मास्कचा वापर करावा.मास्क दर 6 ते 8 तासांनी बदलावा व वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेलाट लावावी. डिस्पोजल मास्क पुन्हा वापरू नयेत. वापरलेले मास्क तसेच अशा व्यक्तीची सुश्रृषा करणाऱ्या व्यक्तीने, निकट सहवासातील व्यक्तींनी घरातील सुश्रृषे दरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्युशन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईड द्रावणामध्ये निर्जतुंक करून त्यांची जाळून विल्हेवाट लावण्यात यावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्ग युक्त समजावा.
घरीच विलगीकरण केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी सूचना
एकाच नातेवाईकाने अशा व्यक्तीचा सुश्रृषा करावी. अशा व्यक्तीच्या शरीराशी थेट संपर्क टाळावे आणि त्यांनी वापरलेले कपडे झटकू नये, घरातील विलगीकरण कक्षाची स्वच्छता करताना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळताना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. डिस्पोजेबल ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. नातेवाईक आणि अभ्यागतांना अशा व्यक्तीना भेटू देऊ नये. घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेल्या व्यक्तींना जर कोविड – 19 बाबत लक्षणे आढळून आली तर त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना 14 दिवस घरातील विलगीकरण कक्षात ठेवावे व पुढील 14 दिवस किंवा अशा व्यक्तींचा प्रयोगशाळा रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत त्यांचा पाठपुरावा करावा.
घराच्या स्तरावरील विलगीकरण कक्षाची स्वच्छता
घरात केलेल्या विलगीकरण कक्षातील असलेल्या व्यक्तीच्या खोलीमधील वारंवार हाताळल्या जाणाऱ्या वंस्तूचे उदा. फर्निचर, बेड फ्रेम, टेबल यांचे 1 टक्के सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण घरगुती ब्लिच किंवा फिनायलने करावे. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेले कपडे, अंथरूण, पांघरूण हे घरातील डिटर्जंट वापरून वेगळे स्वच्छ धुवून वाळवावे. अशी व्यक्ती घरातून बाहेर पडून समाजात मिसळल्यास सदर व्यक्तीमार्फत इतरांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता अशा व्यक्तींवर होम क्वारंटाईन असा शिक्का मारण्यात येतो.
या सूचनांचे तंतोतत पालन करावे, सदर सुचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 188 व 271 अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांना संस्थात्मक विलगीकरण करणेसाठी स्थलांतरीत करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.