जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्ये ; व्यापाऱ्यांनी उद्या घरातच थांबावे…
मालवण, ता. २१ : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या उद्याच्या जनता कर्फ्यु सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय आस्थापने बंद ठेऊन सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत आपल्या घरातच थांबावे, असे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्ये यांनी केले आहे.
श्री. तायशेट्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रशासनास व्यापाऱ्यांकडून सदोदित सहकार्य असतेच. आपल्या देशावर आलेल्या संकटाचे निर्मूलन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापारी प्रशासनाला सदैव साथ देतील. या महामारीच्या संकटात आपल्या जिल्ह्यांमधील ग्राहकांनी कसलीही धास्ती बाळगू नये. आपल्या जिल्ह्यातील व्यापारी बांधवांकडे मालाचा मुबलक साठा असून त्याचा तुटवडा पडणार नाही अशी आम्ही व्यापारी म्हणून आपणास ग्वाही देतो. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका. आपल्या स्वयंपाक घराची स्वच्छता व निगराणी वर लक्ष द्यावे.
फ्रिजमधील शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची साठवणूक वेगळी वेगळी करावी. स्वयंपाक घरात कुत्रा, मांजर इत्यादी पाळीव प्राण्यांना येऊ देऊ नये. अनोळखी विक्रेत्याकडून कोणताही कच्चामाल वापर अन्नपदार्थ विकत घेऊ नये. रस्त्यावरील अनहायजेनिक व उघड्यावरील अन्नपदार्थ विकत घेऊ नयेत. हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा प्रथम साबणाने हात स्वच्छ धुवून नंतरच अन्नपदार्थ सेवन करावे. आम्ही व्यापारी बंधू आपली काळजी घेण्यास उत्सुक आहोत, पण हे करताना आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नये. आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करायचा आहे. तरी २२ मार्चच्या जनता कर्फ्यु मध्ये आपण सर्वांनी आपली सर्व आस्थापने बंद ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाने केले आहे.