सिंधुदुर्ग, ता.21 ः जिल्ह्यातील दोन रुग्णांचे स्वॅब कोरोनाच्या तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. या दोन्ही रुग्णांचे आहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी आज दिली. जिल्ह्यात 3609 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 214 परदेशी प्रवाशांचा समावेश आहे. तसेच सर्व पोलीस तपासणी नाक्यांवर मिळून 1097 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये एकही व्यक्ती कोरोना सदृष्य आढळलेली नाही.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शासकीय यंत्रणेमाफत तालुकानिहाय खाजगी समन्वय अधिकारी म्हणून पुढील डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये कुडाळ येथे डॉ. जी.टी. राणे, कणकवली – डॉ. विद्याधर तायशेटे, मालवण – डॉ. शरदचंद्र काळसेकर, वैभववाडी – डॉ. संजय मराठे, सावंतवाडी – डॉ राजेश नवांगूळ, देवगड – डॉ. सतीश लिंगायत, वेंगुर्ला – डॉ. प्रल्हाद मणचेकर, दोडामार्ग – डॉ. महेश पवार यांचा समावेश आहे. एखाद्या तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यसायिकास एखादा कोरोना सदृष्य रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ या समन्वय अधिकारी किंवा शासकीय तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाशल्य चिकित्सक यांनी केले आहे.
कोरोनासंबंधीची कोणत्याही प्रकारची चाचणी ही खाजगी लॅब मध्ये होत नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारे कोणी चाचणी करत असल्याचा दावा करत असले तर आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अशा गोष्टींना बळी पडू नये. कोरोना संबंधी चाचणीसाठीचे नमुने फक्त शासकीय रुग्णालयामध्येच घेतले जातात व हे नमुने पुणे येथे पाठविले जातात अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 22 मार्च 2020 रोजी देशात जनता कर्फ्यू लागू करण्याविषयी आवाहन केले आहे. तरी या आवाहानास प्रतिसाद देत सर्व नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ज्या व्यक्तींना क्वारंटाईन केलेले आहे त्यांनी गर्दीच्या ठिकाणी अथवा नागरिकांमध्ये मिसळू नये, याची खबरदारी घ्यावी. जर इतर नागरिकांना त्याची बाधा झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत व्यक्तीची राहील. तसेच क्वारंटाईन केलेली व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188 नुसार कारवाई होईल यांची नोंद घ्यावी. जिल्ह्यात आज 98 व्यक्तींना अलगीकरण अर्थात क्वारंटाईन करण्यात आले असून सध्या आयसोलेशन कक्षामध्ये 6 रुग्ण दाखल आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्ह्या प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज असून जिल्हा रुग्णालयाखेरीज उप जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, कणकवली, एसएसपीएम लाईफ टाईम रुग्णालय, परुळेकर रुग्णालय, नवजीवन रुग्णालय, म्हसकर रुग्णालय, रेडकर रुग्णालय, झाट्ये रुग्णालय या ठिकाणी आयसोलेशन कक्षाची सुविधा उभारण्यात आली आहे. येणार्या प्रवाशांच्या तपासणीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेस 20 थर्मल स्कॅनर प्राप्त झाले असून यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे काम करू शकणार आहे.
परदेशातून येणार्या नागरिकांनी आपली माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास दूरध्वनी क्रमांक 02362- 228847 या क्रमांकावर कळवावी. तसेच नागरिकांनीही कोणीही व्यक्ती परदेशातून किंवा बाधित प्रदेशातून आली असेल तर तसेच कोणही क्वारंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्ष, नजिकचे आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन येथे कळवावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.