बुधवारपासून अंमलबजावणी ; पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा…
सिंधुदुर्गनगरी ता.२३: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी झाल्यानंतर येथील जनतेत कोरोना प्रसारबाबत चांगली जनजागृती झाल्याचे वाटत होते. मात्र, सोमवारी जिल्ह्यात 144 नियमाचे उल्लंघन झाल्याचे माझ्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासियांना नियम पाळण्यासाठी आजचा दिवस सवलत देण्यात आली. मंगळवारी थोडे कडक केले जाईल. पण बुधवारपासून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, आ वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर आदी उपस्थित होते.