वेंगुर्ला,ता.२३: वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासन, महसूल अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तहसिल कार्यालय येथे आढावा घेतला. दरम्यान शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात उद्यापासून कारवाई कडक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, सर्व यंत्रणा सज्ज असून सर्व खाती, आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत आहेत. यासाठी नागरीकांची तेवढेच सहकार्य असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे १४४ कलम जारी करण्यात आले असून आज जरी पोलिसांनी किवा प्रशासनाने कडक कारवाई केली नसली तरी उद्यापासून ही कारवाई कडक होणार आहे. तालुक्यात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परराज्यातील येणा-या सर्व सीमांवर बंद करण्यात आल्या आहेत. परराज्यातील नागरीक याठिकाणी येण्याचा पर्याय आता उरलेला नाही. त्यामुळे आहे तशी परिस्थिती पुढील महिनाभर ठेवण्यास आपण यशस्वी झालो तर कोरोनाला आपण चांगल्याप्रकारे परतवून लावू शकतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी वैभव साबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, डॉ.वजराटकर, गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्यासहीत प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.