सकाळी ८ ते ११ या काळातच अत्यावश्यक साहित्य घेता येणार ; आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार…
मालवण, ता. २३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मालवण पोलिसांच्यावतीने आज सायंकाळी शहरात ध्वनिक्षेपकावरून जनजागृती करण्यात आली. नागरिकांना अत्यावश्यक साहित्य सकाळी ८ ते ११ यावेळतच घेता येणार आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ भा. द. वि. १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात संचारबंदी लागू झाली असून नागरिकांना याची माहिती व्हावी यासाठी येथील पोलिसांच्यावतीने शहरातील बसस्थानक ते बाजारपेठ भागात ध्वनिक्षेपकावरून जागृती करण्यात आली. यात अन्न, दूध, फळे, भाजीपाला, किराणा, मासे, चिकन, मटण, बेकरी या आस्थापनांमध्ये जायचे असल्यास संबंधितांना सकाळी ८ ते ११ यावेळतच जावे लागणार आहे. अन्य अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरजे व्यतिरिक्त घरातून बाहेर पडणे टाळावे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समूहाविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भा. द. वि. १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.