सिंधुदुर्गनगरी.ता,२५: कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. या कर्फ्यू दरम्यान जीवनावश्यक वस्तू जसे भाजी पाला, किराणा दुकान, औषधांची दुकाने आणि दवाखाने, पेर्टोल पंप हे सुरूच राहणार आहेत. त्यांच्यावर कोणतेही वेळेचे बंधनही नाही. ही सर्व दुकाने दिवसभरासाठी खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करण्याचे कारण नाही. तसेच आतापर्यंत बेकरी व स्वीट मार्ट यांना सकाळी 8 ते 11 यावेळेत दुकान सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. आजपासून ती मुभा बंद करण्यात येत असून बेकरी व स्टीटमार्टची दुकाने बंद राहणार असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून त्यांच्या वाहतुकीवरही कोणतेही निर्बंध असणार नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्टीकर लावणे तसेच त्यांची संपूर्ण माहिती प्रशासनास देऊन व्यापाऱ्यांनी सहकाऱ्या करावे. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने थांबवण्यात आल्यास प्रशासनास कळवावे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विभागस्तरावर प्रांताधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यता आली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी नगर पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामिण क्षेत्रासाठी गट विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्ग, सागरी महामार्ग व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची नाकाबंदी केली असून रेल्वे सेवा व बस सेवा पुढील आदेशांपर्यंत बंद करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात जुने 4 व्यक्ती दाखल असून सर्वांची प्रकृती चांगली आहे. तसेच आज दिनांक 25 मार्च 2020 रोजी 5 व्यक्ती विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्या असून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. एकून 9 व्यक्ती विलगीकरण कक्षात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात सध्या 197 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले असून त्यामध्ये 18 लोकांना अलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींचे 14 दिवसांसाठी अलगीकरण करण्यात येत असून आवश्यकतेनुसार त्यांना घरीच अलगीकरणामध्ये राहण्याविषयी सूचना देण्यात येत आहेत. घरी अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना व संबंधीत व्यक्तींना घ्यावयाच्या दक्षतांबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सूचना देण्यात येत आहेत. तरी त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
घरीच अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींनी जर नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे दिसल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार गुन्हा नोंद करून सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभाग व पोलीस यंत्रणेस दिले आहेत.
सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनास सहकार्य करावे. काही अडचण असल्यास थेट प्रशासनाशी 1077 या क्रमांकावर किंवा तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष व जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा. कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सर्व नागरिकांनी मिळून साथ द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.