जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी; वाहतुकीसाठी प्रशासनाकडून उपायोजना…
सिंधुदुर्गनगरी,ता.२६:आंबा बागायतदार शेतकरी, व्यापारी यांना दिलासा देणारा निर्णय जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी घेतला आहे. आंबा मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणी विक्रीसाठी नेण्याच्या दृष्टीने पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाहतूकीसाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील आंबा शेतकरी बागायतदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाशी येथिल मार्केट मध्ये आंबा विक्रीसाठी परवानगी देऊन त्यांच्यावरील आर्थिक संकट दूर करावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते.
देवगड हापूस आंबा बागायतदार शेतकरी व्यापारी यांच्यावर आंबा विक्रीचे आलेले संकट दूर करून जीवनावश्यक वस्तू मध्ये हापूस आंब्याचा समावेश करावा आणि वाशी मार्केट येथे आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करणारे निवेदन देवगड हापूस आंबा बागायतदार यांनी पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यासाठी सुपूर्द केले. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप गोविंद नारकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले होते.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्या पासून हापूस आंबा विक्रीसाठी वाशी मार्केट येथे पाठवला जात होता. चालू वर्षी आंब्याचे पीक थोडे उशीरा आले. त्यामुळे आंबा मार्च महिन्यात परिपकव झाला आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवे बरोबरच फक्त जीवनावश्यक वस्तू सुरू ठेऊन इतर सर्व बंद ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. हा निर्णय जनतेच्या हिताचा आहे. आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाजीपाला, फळे,दूध यांचा समावेश आहे. या वस्तूमध्ये हापूस आंब्याचा समावेश करून गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हापूस आंबा वाशी मार्केट मध्ये नेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीची दखल जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी घेतली आहे.
आंबा हा नाशवंत असल्याने आंबा बागायतदार शेतकरी, यांना आंबा विक्रीसाठी सुलभता व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मा. के मंजुलक्ष्मी यांनी सुधारीत आदेश काढून मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी आंबा वाहतूकीसाठी पासेस उपलब्ध करून देण्याची उपाययोजना केली आहे. तसेच आंब्याची वाहतूक करताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी, व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे. तालुका स्तरावरून पासेस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.