सरपंचांचे भावनिक आवाहन; गरजूंना जुने कपडे,चादरी देण्याची केली मागणी…
बांदा.ता,३०:
लॉकडाऊन केल्यानंतर सर्व व्यवस्था ठप्प झाली आहे. गोव्यात जाणारे शेकडो मालवाहू ट्रक बांद्यात अडकल्याने चालक व क्लिनर यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे देखील कठीण झाले आहे. यासाठी शहरातील लोकांनी आपल्याकडे असलेले जुने स्वच्छ कपडे, चादर या गरजूंना देऊन मदतीचा हात द्यावा. या वस्तू बांदा ग्रामपंचायतीत आणून द्याव्यात असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
लॉकडाऊन कालावधी संपण्यास अजून पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव न थांबल्यास हा कालावधी वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शहरात अडकलेल्या परराज्यातील चालक, क्लिनर यांची कपड्यांअभावी गैरसोय होणार आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी आपल्याकडील वापरात नसलेले जुने स्वच्छ कपडे, झोपण्यासाठी चादरी द्याव्यात असे आवाहन खान यांनी केले आहे.