काल सायंकाळची घटना; पाच शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान…
बांदा ता.०२: वाफोली धरण परिसरात काल सायंकाळी उशिरा लागलेल्या आगीत काजू बागायती जळून खाक झाली. ऐन काजू हंगामात लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या आगीत विलास गणपती गवस, राजेंद्र तुकाराम गवस, हरी रामा गवस, प्रेमानंद कृष्णा गवस, दशरथ शंभू गवस यांचे ५ एकर क्षेत्रातील १०० काजू, १० आईन, ५ किनळ, २२ चार, ५० आकेशिया जळून खाक झालेत. वाफोली तंरमुक्ती समिती अध्यक्ष मंथन गवस, पोलीस पाटील आना गवस यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे केलेत. तलाठी व महसूल अधिकारी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सेवेत असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. आज सकाळपर्यंत आग सुरूच होती. स्थानिकांनी सकाळी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.