प्रबोधनपर मजकुराने रस्ते रंगवून नागरिकांमध्ये जनजागृती…
वेंगुर्ला : ता.०२: स्वच्छतेमध्ये देशात अव्वल ठरलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेने कोरोनाच्या विरोधातील उपाय योजनामध्येही विविध प्रयत्न चालूच ठेवले आहेत.
शहरातील रस्त्यांवर सध्या “आपण खरंच कामासाठी बाहेर पडताय का?..विनाकारण फिरत असाल तर कुटुंब आणि शहराला धोक्यात आणत आहात…घरात बसुया, कोरोना टाळूया…असे संदेश नागरिकांना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्शवभूमीवर नागरिकांना सतर्क करण्याचे काम नगरपरिषदेने सुरूच ठेवले आहे.
आतापर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वछतेत देशात अव्वल क्रमांक प्राप्त केलेला आहे. शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय, कार्यालयीन कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झाले.असाच एकत्रित प्रयत्न कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांच्याच सहकार्यातून सुरू आहे व त्यात नक्कीच यश मिळेल,असा विश्वास नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी व्यक्त केला आहे. शहरातील संपूर्ण बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहेत. केवळ किराणा माल, औषधे दुकाने ठराविक वेळेत ठराविक अंतर राखून चालू ठेवण्यात येत आहेत. नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये,यासाठी घरपोच सेवा देणाऱ्या दुकानदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मटण,चिकन,अंडी,मासे सुद्धा घरपोच सेवेद्वारे पुरविण्यात येत आहेत. रोज सायंकाळी संपूर्ण फळ व भाजीपाला मार्केट निर्जंतुक करण्यात येत आहे. शहरात सगळीकडे दिवसातून दोनवेळा डास प्रतिबंधक धूर फवारणी करण्यात येत आहे.आजपर्यंत संपूर्ण शहरात १०,००० मास्क वितरित करण्यात आले असून आणखी ५,००० मास्क तयार करण्यात येत आहेत. शहरात ६ ठिकाणी हॅन्डवोश सेंटर उभारणी करण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शन करणारे ऑडिओ क्लिप सर्व घंटागाड्यावर वाजविण्यात येत आहे.
नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केलेल्या आवाहनाला शहरातील दानशूर व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.शहरात बाहेरून आलेल्या कामगार,गरजू व्यक्तींची कुटुंब यादी तयार करून त्यांना कमीत कमी आठ दिवस पुरेल एवढा अन्नसाठा यांचे वितरण करण्यात आलेले आहे. कोणीही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही याची दक्षता स्वतः नगराध्यक्ष दिलीप गिरप, त्यांचे सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी घेत आहेत. आतापर्यंत नगराध्यक्ष यांच्या आवाहनाला बहुसंख्य दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य, भाजीपाला, तसेच आर्थिक मदत देऊन सहकार्य केले आहे. अजूनही काहींना अन्नधान्याची आवश्यकता आहे. गरजू व्यक्तींची यादी तयार करणे व त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील व कार्यरत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये,आवश्यक मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल,असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.