कुमामे-नागिंदेवाडी येथील लमाण कुटुंबाना जिवनावश्यक साहित्याचे वाटप…
सिंधुदुर्गनगरी ता.०४: देशात कोरोना कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंध उपाय म्हणून लाॅकडाऊन जाहीर केले आहे.त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची समस्या निर्माण झाली आहे.याची सामाजिक जाणीव ठेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती,सिंधुदुर्गच्या वतीने पहिल्या टप्प्यात पणदूर येथील संविता आश्रमास वीस हजार रुपयांचे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.तसेच वैभववाडी येथील सोनारी गावातील लमाण कुटुंबियांनाही पाच हजार रुपयांचे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.
याच उपक्रमाचा दुसरा टप्पा म्हणून कुमामे नागिंदेवाडी येथील परप्रांतीय मजुरांना दिनांक- 2 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता जीवनावश्यक अन्नधान्य साहित्य वाटप करण्यात आले. सदर कामगार हे कर्नाटक विजापूर येथील असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊनमुळे त्यांना स्वतःच्या राहत्या घरी जाणे शक्य नाही.त्यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. हे संघटनेच्या कानावर आल्यावर संघटनेने तात्काळ धाव घेऊन अन्नधान्य साहित्य वाटप केले. 30 कुटुंबातील साधारण 100 ते 120 लोकांना अन्नधान्य साहित्याचा फायदा होणार आहे. या परप्रांतीय कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ, तीन किलो गव्हाचे पीठ,एक किलो तेल पिशवी,कडधान्य एक किलो, कांदे दोन किलो,बटाटे दोन किलो ,साखर अर्धा किलो, गूळ अर्धा किलो, लक्स साबण दोन, ओके साबण चार आदि जीवनावश्यक साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्यांनी संघटनेला खूप खूप धन्यवाद व आशीर्वाद दिला.
यावेळी शिक्षक भारती चे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे सर, कट्टा बीट उपाध्यक्ष श्री कृष्णा कालकुंद्रीकर सर, मसुरे बीट उपाध्यक्ष श्री सागर कुराडे सर तालुका संघटक श्री तुकाराम खिल्लारे सर व श्री संजय जाधव सर आदी शिक्षक भारतीचे शिलेदार व कुमामे पोलीस पाटील श्री राजेंद्र चव्हाण, स्वयंसेवक श्री संदीप नाईक , श्री सुमित पटेल लाकूड व्यापारी इत्यादी उपस्थित होते. उपस्थितांनी संघटनेने जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे खूप खूप कौतुक केले. तसेच शिक्षक भरतीच्या सर्व देणगीदारांचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे सर यांनी आभार मानले व यापुढेही संघटना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे सांगितले.