ट्रक चालक-मालक संघटनेचे नीतेश राणेंना निवेदन
कणकवली, ता.4 ः राज्यात आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक सेवा पूर्णतः ठप्प आहे. यात ट्रक व टेम्पो मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे ट्रक, टेम्पोचे टॅक्स आणि इन्शुरन्स माफ व्हावेत अशी मागणी ट्रक चालक-मालक संघटनेने आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली आहे.
ट्रक टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुरेश सावंत यांनी म्हटले की, वाहतूक सेवा बंद असल्याने चालक व मालक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रक व टेम्पो मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. बँक कर्ज असल्याने हप्ते थकणार आहेत. त्यामुळे टॅक्स आणि इन्शुरन्स माफ झाला तरच ट्रक, टेम्पो चालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
कोकणात ट्रक व टेम्पो वाहतूक फक्त सहा महिने सुरू असते. एक वर्षासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च टॅक्स आणि इन्शुरन्स साठी येतो. निदान तेवढा तरी माफ करावा,याबाबत गांभीर्याने विचार करून टेम्पो ट्रक चालकांना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी आमदार नीतेश राणे यांच्याकडे ट्रक टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुरेश सावंत यांनी केली आहे.