प्रमोद जठार ः कोकणच्या जनतेने राऊत यांना जाब विचारावा
कणकवली, ता.4 ः ज्या नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर आपण निवडून आलो, त्या मोदींच्या पाठीशी राहण्याऐवजी खासदार विनायक राऊत हे पंतप्रधान मोदींवर टीका करून आपली बौद्धिक दिवाळखोरीच जगासमोर मांडत आहेत. कोकणच्या जनतेने राऊत यांच्या टुकार कारभाराचा जाब विचारण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली.
श्री.जठार यांनी म्हटले की, देशातील जनतेने रविवारी रात्री 9 वाजता दिवे पेटवावेत असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. मात्र मोदींच्या या आवाहनाची खासदार विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या संकटाशी लढताना जे धैर्य, संयम आणि संकल्पाची भूमिका बजावली, त्याचे जगभर कौतुक झाले. अशा व्यक्तीमत्वावर बोलताना खासदार राऊत यांनी एकदा स्वतःकडे बघण्याची गरज आहे.
श्री.जठार म्हणाले, आज कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. 120 कोटी जनता आज घरात बसून आहे. तिने काय करायला पाहिजे, हे कोणीच सांगत नाही. मोबाईल, टीव्ही पाहणे, त्यातून मनोरंजन करणे यात वेळ घालविण्याचे काम लोक करत आहेत. भविष्यात मानसिक समस्येसोबत शारीरिक, आर्थिक, व्यावसायिक समस्यांचे महा-आव्हान भारतासमोरच नव्हे, तर संपूर्ण विश्वासमोर उभे राहणार आहे. या संकटाचा सामना करायचा असेल तर नैराश्य झटकून संपूर्ण भारतीय नागरिकांमध्ये सांघिक भावना निर्माण झाली पाहिजे. ती टिकून राहिली पाहिजे. संपूर्ण भारतीयांची ती एकत्रित भावना मागच्या थाळी आणि टाळी कार्यक्रमातून विश्वाला दिसली. त्याचधर्तीवर आता दिवे लावण्याच्या कार्यक्रमाकडे याच संवेदनशिलतेने पाहायची गरज आहे. मात्र हे समजून घेण्याची पात्रता खासदार विनायक राऊत यांची नाही. मोदींचे विचार समजण्याएवढीही राऊत यांची वैचारिक पातळी असू नये, ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जनतेला जो माणूस प्रगतीचे, उन्नतीचे दिवस दाखवू शकत नाही, त्याने मोदींच्या राजकारणावर टीका करावी, हा बेअक्कल बालिशपणा आहे.