सामाजिक कार्यकर्ते भुईबावडा गावचे सुपुत्र सुनिल नारकर यांचा कौतुकास्पद उपक्रम…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.०५: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन असल्यामुळे गरजूंना रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद आहेत. हातावर पोट भरणा-या लोकांचे हाल होऊ नये म्हणून भुईबावडा गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य समाज गौरव पुरस्कृत समाजसेवक सुनिल नारकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल भुईबावडा पंचक्रोशीतील नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.
कोरोना या साथीच्या रोगांमुळे संपूर्ण देश संकटाचा सामना करत आहे. त्याचा प्रभाव ग्रामीण सर्वसामान्य जनतेवर पडला आहे. देशातील जनता कर्फ्यु आणि लॉकडाऊनमुळे सध्या घरीच अडकून राहिली. परिणामी रोजचा दैनंदिन घरखर्च, शिक्षणखर्च, आजारपण याचा भर वाढत आहे. त्यात २५ दिवस बंद असल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत होत असताना सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते सुनील नारकर यांनी गरजूंना अत्यावश्यक मदत केली.
प्रत्येक व्यक्तीच्या संकटकालीन परिस्थितीत ते नेहमी धावून जात मदत करत असतात. डोंबिवली शहरात ही त्यांनी धान्यवाटप मोहीम हाती घेतली आहे. तसेच भुईबावडा पंचक्रोशीतील शैक्षणिक जडणघडणीतही ते वेळोवेळी हातभार लावतात.
यावेळी जि. प. समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, महाराष्ट्र राज्य समाजगौरव पुरस्कृत समाजसेवक सुनिल नारकर, विश्वजित नारकर, मनोहर मोरे, जयशंकर मोरे, विनोद नारकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.