दयानंद कुबल यांचा पुढाकार; मुंबईतील ११२ बेघर लोकांनी घेतलेला…
बांदा.ता,०६: मुंबई-माटुंगा येथील कचऱ्यातून प्लास्टिक जमा करून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि कोरोनामुळे उपासमारीची वेळ आलेल्या २१ कुटुंबातील ११२ बेघर लोकांना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून संस्था अध्यक्ष दयानंद कुबल यांनी किराणा सामान वाटप केले. त्यांच्या दातृत्वाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी उपस्थित महिलेने आपली व्यथा मांडली. आम्ही कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करून भंगार वाल्याना विकून आम्ही आमचा घर चालवतो. पण आता लॉकडाऊन मुळे रस्त्यावर कचराच नाही व आम्ही बाहेर पडु शकत नाही त्यामुळे आमचे काम बंद झाले. आम्ही लोकांकडे मदत मागू शकत नाही. आमचे कामच बंद पडले आहे मग आम्ही घर कसे चालवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमची व कुटुंबातील लहान मुलांची उपासमार झाली आहे. गेली कित्येक वर्षे आम्ही रस्त्यावर राहतो पण आम्हाला कोणत्याही सोयी सुविधा नाहीत, या झोपडीत आमचे जगणे हलाखीचे आहेच त्यात आता आलेला कोरोना व्हायरस जगू पण देत नाहीय, अशा भावना मांडल्या.
आमच्यासारख्या झोपडीत रहाणाऱ्या लोकांसाठी कोकण संस्थेच्या माध्यमातून किराणा मालाचे वाटप केले जात आहे हे खुप कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील दानशूर व्यक्तींना अशा लोकांना मदत करायची असेल तर त्यांनी संस्थेला संपर्क करावा असे आवाहन दयानंद कुबल यांनी केले आहे.