२४ दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका; ६ हजार ७०० रुपये दंड वसूल…
बांदा ता.०६: शहरात गेल्या काही दिवसांपासून विनाकारण दुचाकी घेऊन फिरणार्यांवर बांदा पोलीसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी २४ दुचाकीस्वारांवर कारवाई करुन ६ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. संचारबंदीची कडक अंमलबजावणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चांगलीच फजिती होताना दिसत आहे. दुचाकीस्वारावर कारवाई झाल्याने बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र, काही लोकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी नागरी भागात दुचाकी फिरविणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. तरीही नाहक फिरणार्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने पोलीसांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. दुचाकीवरून उगाचच फिरताना आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येत आहे.
रविवारी दिवसभरात संचारबंदीचा आदेश भंग केल्यामुळे तसेच विनाकारण दुचाकी घेऊन फिरत असलेल्या २४ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यातून एकूण ६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी गोवा – महाराष्ट्र सीमेवरील चेकनाक्यावर भेट देत पोलीसांना अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या. यावेळी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपस्थित होते.