शहरातील १२२ स्वयंसेवकांकडून घरपोच सुविधा घ्या ; पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांचे आवाहन…
मालवण, ता. ६ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीस बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी आतापर्यंत ६५ दुचाकी जप्त करण्याची कारवाई केली आहे. या व्यतिरिक्त लॉकडाऊनच्या काळात ५७१ वाहनांवर कारवाई करत १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सुविधा पुरविणाऱ्या व्यतिरिक्त अन्य दुचाकीस पूर्णतः बंदी घातली आहे. मात्र शहरात अनेक तरुण तसेच अन्य व्यक्ती विनाकारण सातत्याने दुचाकी घेऊन फिरत असल्याने अशा व्यक्तींवर कारवाईचे कडक पाऊल पोलिसांनी उचलले आहे. यात आतापर्यंत ५७१ वाहनचालकांवर कारवाई करत १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर दुचाकीस बंदी असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६५ जणांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या दुचाकीस्वारांकडे ओळखपत्र नाहीत अशा दुचाकी जप्त करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिका प्रशासनाकडून दोनशेहून अधिक जणांना स्वयंसेवकांचे पास देण्यात आले आहेत. यातील बरेच स्वयंसेवक विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास असल्याने त्यांचे पास जप्त करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आहे. केवळ १२२ स्वयंसेवक जीवनावश्यक सेवा पुरवीत असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. त्यामुळे शहरवासीयांनी स्वतः घराबाहेर न पडता याच स्वयंसेवकांच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य घरपोच उपलब्ध करून घ्यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक चौधरी यांनी केले आहे.