राजन तेलींचे ग्राम कमिटी अध्यक्षांना आवाहन
कणकवली, ता.7 ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब जनतेसाठी मोफत धान्य पुरविण्याची घोषणा केली. मात्र अनेक ठिकाणी धान्य वितरित करण्यात काही अडचणीत येत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह ग्रामकमिटी अध्यक्षांनी रेशन दुकान चालकांना सहकार्य करावे. प्रत्येक गरिबांपर्यंत धान्य पोच होण्यासाठी कार्यवाही करावी असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
रेशनवरील धान्य प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोचावे याअनुंगाने राजन तेली यांनी आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने आणि तहसीलदार आर.जे.पवार यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, सरचिटणीस सुदन बांदिवडेकर, महेश गुरव, उपाध्यक्ष सोनू सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते
राजन तेली म्हणाले, सध्याच्या कोरोना साथ रोगाच्या काळात कोणीही अन्नावाचून राहू नये यासाठी भाजपा कार्यकर्ते गावागावात काम करत आहेत. त्याचप्रमाणे रेशन धान्य दुकानदारांनी केंद्राच्या योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करावी. तर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी रेशन दुकानांना धान्य पुरवठा वेळेत होण्यासाठीचे नियोजन करावे. ज्या रेशन धान्य दुकानदारांकडे धान्यसाठा करण्यासाठी गोडाऊन कमी पडत असेल त्यांच्यासाठी लगतच्या प्राथमिक शाळेत धान्यसाठा करावा करण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या आम्ही प्रशासनाकडे केल्या आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील अनेक मोठ्या ठेकेदारांकडे मजूरवर्ग आहे. मात्र त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेकडे ठेकेदार दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याचे श्री.तेली म्हणाले.