केतन आजगावकरांचे प्रत्युत्तर ; अर्धवट माहितीच्या आधारे, परुळेकरांनी बोलू नये…
सावंतवाडी,ता.०८: येथील पालिकेच्या विविध विकास कामासाठी जाहीर झालेला ४६ कोटीचा जिल्हा नियोजनचा निधी तीन वर्षे अडकून पडला होता, तो निधी तीन महीन्यात खेचून आणण्याचे काम नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. त्यामुळे जयेंद्र परुळेकर यांनी माहिती घेऊनच नंतर नगराध्यक्षांवर टीका करावी, असे प्रत्युत्तर भाजपाचे मंडल प्रवक्ते केतन आजगावकर यांनी दिले.
परब यांना लोकांनी थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले गेले. अनेक वर्षे ते लोकांच्या संपर्कात आहेत. सुखदुःखात ते लोकांना साथ देतात. त्यामुळे जे सावंतवाडी पालिकेत मतदानच करत नाहीत अशांनी त्यांच्यावर टीका करणे, कितपत योग्य असाही सवाल आजगावकर यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी साथ दिल्यामुळे परुळेकर स्वीकृत नगरसेवक झाले. परंतू, त्यांनी या काळात पालिकेचा अभ्यास केलेला नाही. ते करत असलेले टीका योग्य नाही. आपल्या या नगरसेवकांचे अपयश झाकण्यासाठी त्यांनी नगराध्यक्षावर टीका करू नये.
परब यांनी गेली तीन वर्षे रखडलेला ४६ कोटी रुपयाचा निधी तीन महिन्यात आणण्याचे काम केले. ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर बॅ.नाथ पै सभागृह, बाजारपेठेतील विविध प्रश्न त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. हे येथील जनता नाकारू शकत नाही. त्यामुळे नाहक टिका करण्यापेक्षा प्रथम परुळेकर यांनी अभ्यास करावा,असेही त्यांनी म्हटले आहे.