नगराध्यक्षांचा उपक्रम ; तब्बल १८० जणांनी घेतला लाभ..
कणकवली, ता.१५: शहरात अडकलेल्या परप्रांतीयांची अबाळ होऊ नये यासाठी दररोज दीडशे जणांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुरू केला. या उपक्रमाच्या आजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 180 जणांनी या कमळ थाळीचा आस्वाद घेतला. तसेच या उपक्रमबद्दल श्री.नलावडे यांचेही आभार मानले.
कणकवली शहरात विविध व्यवसायाच्या ठिकाणी मोल मजूरी करणारे परप्रांतीय लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. त्यांच्या जेवणाचे हाल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ‘कमळ थाळी’ हा मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा शुभारंभ आज शहरातील विद्यानगर भागातील लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात करण्यात आला. आज दुपारी 12 ते 2 या वेळेत शहर परिसरातील तब्बल 180 जणांना मोफत जेवण देण्यात आले. लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत कमळ थाळीचा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती श्री.नलावडे यांनी दिली.
कमळ थाळीमध्ये दोन वाट्या भात, दोन चपात्या, आमटी आणि भाजी या पदार्थांचा समावेश आहे. याथाळीसाठी येणारा खर्च नगराध्यक्ष मानधनामधून करणार असल्याचीही माहिती श्री.नलावडे यांनी दिली. दरम्यान सोशल डिस्टन्सींगचे पालन करून सर्व गरजूंना लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात कमळ थाळी देण्यात आली.
———————–