पालकमंत्र्यांचे निर्देश ;कणकवली तहसील कार्यालयात घेतला आढावा
कणकवली, ता.१५: साकव आणि पुलांची कामे सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने ठेकेदारांनी स्थानिक कामगार घेऊन ही कामे तातडीने सुरू करावीत. पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ नयेत यासाठी पाणी टंचाईची कामे लगेच सुरू करा. नगरपंचायत हद्दीमधील रस्त्यांची कामे, कणकवली शहरातील उड्डाणपुलाचेही काम नियोजन करून सुरू करा आदी निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर.जे.पवार, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यासह आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले आदी उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. गोरगरीब आणि परजिल्ह्यातील मजूरांसाठी शिवभोजना योजना देखील चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे. गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कॅन्टींगची सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. याखेरीज उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस मशिनचा वापर कावीळ झालेल्या रुग्णांसाठी स्वतंत्रपणे केला जाईल. कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित जे रूग्ण आहेत त्यांना घरपोच औषधे पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभागाला जबाबदारी देण्यात आल्याचे ते म्हणाले.
श्री.सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकामकामे ठप्प झाली होती. त्याबाबत शासन वेळोवेळी गाईडलाइन जारी करत आहे. त्यानुसार पाणी टंचाई, साकव, नळयोजना आदींची कामे जिल्हा परिषद आणि बांधकाम विभागांनी सुरू करावीत अशा सूचना त्या विभागांना करण्यात आल्या आहेत.
———————–