परशुराम उपरकर ; लॉकडाऊन असताना मुंबईतील लोकप्रतिनिधी सिंधुदुर्गात कसे…?
कणकवली, ता.१६:सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या चोख कामगिरीमुळे सिंधुदुर्गातून कोरोना हद्दपार झाला आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य आणि पोलिस यंत्रणा जिवाचे रान करत आहे. अशावेळी पालकमंत्री तालुका निहाय बैठकांचा सपाटा घेऊन आरोग्य यंत्रणेला वेठीस का धरत आहेत? असा प्रश्न मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या मुंबईतून भाजपचे लोकप्रतिनिधी सिंधुदुर्गात कसे काय येतात. त्यांना इथल्या जनतेच्या आरोग्याची काळजी नाही का? असाही प्रश्न श्री.उपरकर यांनी उपस्थित केला आहे.
श्री.उपरकर यांनी पत्रकात म्हटले की, जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी पातळीवर बैठक झाल्यानंतर पुन्हा तालुकावार बैठका का घेतल्या जातात. या बैठकांमुळे तेथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्यांना तासन्तास थांबावे लागते. पालकमंत्र्यांची बैठक झाली की आमदार तालुक्यात जाऊन वेगळ्या बैठका घेऊन काय साध्य करतात? प्रशासनाच्या नियंत्रणामुळे कोरोनाच्या लढ्यात अत्यंत सुनियोजित काम होत असताना अशा आढावा बैठकांमध्ये प्रशासनाला नाहक गुंतवून ठेवू नये.
श्री.उपरकर म्हणाले, भाजपचे मुंबईतील काही लोकप्रतिनिधी आता सिंधुदुर्गात येऊ लागले आहेत. एवढेच नव्हे तर हे प्रतिनिधी बैठका आणि पत्रकार परिषदाही घेत आहेत. मुंबईतून आलेले हे लोकप्रतिनिधी सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्था धोक्यात आणत आहेत याचा त्यांनीच विचार करायला हवा. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या पार्शभूमीवर लोकप्रतिनिधींनीही निर्बंध पाळायला हवेत.
पालकमंत्री तसेच इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी वारंवार आढावा बैठका घेण्यापेक्षा जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांत व्हेंटीलेटर्सची सज्जता ठेवायला प्राधान्य द्यायला हवे. आरोग्य विभागातील भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य कसे मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे. तसेच सध्याची परिस्थिती ही श्रेयाच्या राजकारणाची नाही तर प्रशासनाला सहकार्य करण्याची आहे असेही श्री.उपरकर यांनी म्हटले आहे.