उदय सामंत; एलईडी मासेमारी बंद करणार…
सिंधुदुर्गनगरी,ता,१६: जिल्ह्यातील मच्छिमारांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यास कटिबद्ध असून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी काम करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. जिल्हधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये मच्छिमार संघटनांशी आज पालकमंत्री श्री. सामंत यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
एलईडी मासेमारी बंद झालीच पाहिजे असे सांगून पालकमंत्री श्री . सामंत पुढे म्हणाले की, एलईडी मासेमारी करणाऱ्यावर कठोर कारवाई झआलीच पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. मच्छिमाराना दिल्या जाणाऱ्या डिझेल परताव्या विषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मच्छिमार अडचणीत आले आहेत. त्यांना सर्व ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे. सर्व प्रकारची मच्छिमारी ही शासनाच्या नियमानुसारच झाली पाहिजे. मासे विक्रीसाठी बाजारपेठेबाबत संबंधीत नगर पालिका प्रशासन निर्णय घेईल. पण, त्यासाठी मच्छिमार सोसायटींनी थोडे थांबावे. क्रियाशिल मच्छिमार व सोसायटी सभासद याविषयी शासनास विनंती करण्यात येईल. क्रियाशिल मच्छिमारांची व्याख्या निश्चित करण्यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. पर्यटनाच्या बाबत पर्यटन व्यवसायिकांना कर्जाबाबत काही सवलत देणे याविषयी लिड बँकेच्या बैठकीमध्ये चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे मत्स्य आयुक्त आदी उपस्थित होते.